Meerut Lok Sabha Election – रामानंद सागर यांच्या छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय झालेल्या रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल (Arun Govil) यांना भारतीय जनता पार्टीने (BJP) उत्तर प्रदेशच्या मेरठ (Meerut) येथून उमेदवारी जाहीर केली आहे. आता रामायणातील या रामासाठी मते मागण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची ३० मार्च रोजी मेरठ येथे सभा होणार आहे. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरीही या सभेला उपस्थित राहणार आहेत.
गेल्या सात लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर मेरठच्या जागेवर भारतीय जनता पार्टीने पाच वेळा विजय मिळवला आहे. २००९, २०१४ आणि २०१९ अशी सलग तीन वेळा ही जागा जिंकली आहे. त्यापूर्वी १९९६ आणि १९९८ मध्ये भाजपला या जागेवर विजय मिळाला होता. १९९९ मध्ये ही जागा कॉंग्रेसचे अवतार भडाना यांनी तर २००४ मध्ये बहुजन समाज पक्षाचे मोहम्मद शाहीद यांनी जिंकली होती.
२०१४ मध्ये राजेंद्र आग्रवाल यांना २ लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळाला होता. विरोधी पक्षांतील मतांची फाटाफूट त्यांच्या पथ्यावर पडली होती. कॉंग्रेस पक्षाने अभिनेत्री नगमा यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना केवळ ४२ हजार मते मिळाली होती.
२०१९ ची निवडणूक मात्र भाजपसाठी तापदायक ठरली होती. येथे समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांनी आघाडी करून संयुक्त उमेदवार दिला होता. कसाबसा पाच हजार मतांचा लीड घेत भाजपचे आग्रवाल विजयी झाले होते.
दोन लाख ते पाच हजार इतके त्यांचे मताधिक्क्य कमी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यावेळी भाजपने लोकप्रिय चेहरा पुढे केला आहे. शिवाय राष्ट्रीय लोकदल आता भाजपसोबत आहे. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही सगळी रचना भाजप उमेदवाराच्या फायद्याची ठरणार आहे.