मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतरही तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे. शिवसेनेने इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. यावरून प्रथम कॉंग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही शिवसेनेच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. पण तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही. अजित पवारांना विरोधी पक्षनेता करताना राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा केली होती. ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त आहे, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो, ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. पण इतरांचा पाठिंबा घ्यायचा प्रयत्न विरोधी पक्षनेता नेहमीच करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेतेपदीच्या निवडीचा शिवसेनेने निर्णय घेण्यापूर्वी एकदा चर्चा करायला हवी होती. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे गेले. विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता आम्हाला हवा होता. त्यामुळे यावर बसून निर्णय घेता आला असता. मात्र आम्हाला शिवसेनेने न कळवताच विरोधी पक्षनेता निवडला. मुळात आमची आघाडी विपरीत परिस्थीतीमध्ये झाली होती, आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 आणि कॉंग्रेसचे 10 आमदार आहेत.विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे, तर विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसला मिळायला पाहिजे होते, असे वक्तव्य कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले होते. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही, हा आमचा आक्षेप आहे. आम्ही जर मित्र आहोत तर एकमेकांशी बोलले पाहिजे, अशा शब्दांमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.