नवी दिल्ली – महाराष्ट्रातील 20 पैकी 15 मंत्र्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मंत्र्यांचे ते प्रमाण 75 टक्के आहे. गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांची संख्या 13 आहे. ते प्रमाण 65 टक्के इतके आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या 20 इतकी झाली आहे. त्या विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीवेळी मंत्र्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची छाननी केली. त्याआधारे मंत्र्यांविरोधातील गुन्हे, त्यांची संपत्ती आणि शिक्षणाविषयीचा अहवाल जारी करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व मंत्री करोडपती आहेत. त्यांची सरासरी संपत्ती 47 कोटी रूपयांहून अधिक आहे. मंगलप्रभात लोढा सर्वांत श्रीमंत मंत्री आहेत. ते 441 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. तर, संदिपान भुमरे यांच्याकडे सर्वांत कमी म्हणजे 2.92 कोटी रूपयांची संपत्ती आहे. मंत्र्यांपैकी 8 जणांनी (40 टक्के) इयत्ता 10 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 11 मंत्र्यांनी (55 टक्के) पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. एक मंत्री डिप्लोमाधारक आहे. राज्यातील 4 मंत्री 41 ते 50 वर्षे वयोगटातील आहेत. उर्वरित मंत्री 51 ते 70 वर्षे वयोगटातील आहेत.