अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी चीनचा विरोध डावलून तैवानला भेट दिल्यामुळे चीनचा पापड मोडला आहे. या प्रकरणात चीनकडून अमेरिकेला धडा शिकवणारी कृती अपेक्षित होती. पण आता त्यांनी तैवानलाच दमात घेण्याचा प्रयत्न चालवला असून चीन आता तैवानचा घास घेणार असल्याचे सध्याचे एकूण वातावरण आहे. या स्थितीत संपूर्ण जगातच अस्थैर्य माजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर चीनने तैवान सीमेवरील सहा भागांत 4 ते 6 ऑगस्ट या अवधीत लष्करी युद्ध सराव करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी तेथे महाकाय युद्धनौका आणि विमाने तसेच क्षेपणास्त्रांच्या कवायती केल्या आणि त्याचा प्रत्यक्ष वापर करून युद्धाचाही सराव केला. वास्तविक या कवायतींची मुदत संपल्यानंतर त्यांनी आपली ही युद्ध यंत्रणा तेथून हलवण्याची गरज होती. तथापि आजही त्यांनी तेथील आपले लष्करी अस्तित्व आणि सराव कायम ठेवला असून तो नेमका कधी संपणार याची कोणतीही घोषणा चीनने केलेली नाही. त्यामुळे चीनचा हा युद्ध सराव म्हणजे थेट तैवानवरील हल्ल्याची तयारी आहे काय, अशी शंका जागतिक लष्कर तज्ज्ञांना येऊ लागली आहे. लहानशा तैवाननेही आता चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकणाला तोंड देण्यासाठी आपल्याही युद्धनौका या भागात उतरवल्या आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे.
नॅन्सी पेलोसी यांना तैवानला धाडून अमेरिकेने थेट चीनलाच आव्हान दिले आहे, हे जरी खरे असले तरी त्याची मोठी किंमत तैवानला भोगावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनने तेथे आगळीक केलीच तर अमेरिकेला तेथून मागे हटता येणार नाही. अमेरिका तैवानच्या मदतीला धावून गेली की मग बाकीच्या अमेरिकेचे मित्र असलेल्या देशांनाही त्यात उतरावे लागणार आहे. चीनच्या बाजूने उत्तर कोरिया आणि रशियालाही तेथे उतरावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संघर्षाची भविष्यातील व्याप्ती खूपच मोठी असणार आहे. त्याचे गंभीर परिणाम जगातील सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. आधीच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झालेला आहे.
जगात कोविडमुळे झालेले नुकसान अजून भरून निघालेले नाही. जागतिक कंपन्यांचा आणि एकूणच अर्थकारणाचा मोठा विचका सध्या झाला आहे. त्यात या नवीन संघर्षाची भर पडली तर त्याचे काय भीषण परिणाम होतील याची कल्पना करवत नाही. हा संघर्ष टळण्याचीही कोणती आशा उरलेली नाही. जगात अमेरिकेच्या स्पर्धेला तोडीस तोड म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या चीनला अमेरिकेमुळे आपल्यावर आलेली नामुष्की अशी सहजासहजी विसरता येणार नाही. चीन केवळ मूग गिळून गप्प बसण्याचीही शक्यता नाही.
नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीचा वचपा काढण्यासाठी ते अमेरिकेवर हल्ला करण्यापेक्षा तैवानलाच धडा शिकवण्याच्या भूमिकेत असतील आणि ते तैवानला आपल्या ताब्यात घेतील अशी शक्यता अधिक आहे. नाही तरी तैवानला कधीना कधी आपल्या कब्जात घेण्याचा चीनचा गेल्या अनेक दिवसांचा प्रयत्न आहे. त्यांना ही आयती संधी चालून आली आहे त्याचा ते लाभ घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असेच सध्याचे एकूण वातावरण आहे. तथापि या संघर्षातून जो काही विनाश घडण्याची शक्यता आहे त्याचा चीनकडून कितपत विचार केला जाईल याची शंकाच आहे. त्यांचे राज्यकर्ते सारासार विचार करण्याच्या मनस्थितीत नसतात.
चीनने अलीकडच्या काळात पाशवी शक्ती प्राप्त केली आहे. ही शक्ती लष्करी आणि आर्थिक या दोन्ही स्वरूपाची आहे. अनेक राष्ट्रांना आर्थिक मदत करून त्यांनी त्यांना आपले गुलाम करून ठेवले आहे. या शक्तीचा चीनला कधीनाकधी वापर करायची जुनी खुमखमी आहे, आणि त्यातून त्यांना आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. चीनच्या हल्ल्यातून तैवानचे जे नुकसान होणार आहे त्याला अमेरिका सर्वस्वी कारणीभूत ठरणार आहे. अमेरिकेला तैवानच्या लोकशाहीचा मोठाच पुळका आला आहे. जगातील लोकशाही मजबूत करण्यासाठी म्हणून त्यांनी नॅन्सी पेलोसी यांना तिकडे पाठवले होते. आता चीनच्या तावडीतून तैवानची सुटका करण्याची हमीही अमेरिकेने दिली पाहिजे. ही जबाबदारी अमेरिका किती नेमकेपणाने पार पाडेल या विषयी जागतिक युद्ध तज्ज्ञ आणि भू राजकीय तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता दिसते.
चीनला खिजवून अमेरिका मोकळी झाली, पण त्यांना येथून पुढे मोठे धुणे धुवावे लागणार आहे याची त्यांनीही तयारी केलीच असणार. या संघर्षाच्या स्थितीत तैवान आणि अमेरिका यांना धडा शिकवण्यासाठी चीन नेमके काय काय करू शकतो याचा अभ्यास अमेरिकन लष्करी तज्ज्ञांनीही केला असणारच त्यादृष्टीने त्यांनीही सिद्धता ठेवलीच असणार. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी सध्या जी मोठी धुसफूस सुरू झाली आहे त्याचा कोणत्याही क्षणी भडका उडण्याची शक्यता आहे. तैवान आणि चीन यांच्यात नेमका काय संघर्ष आहे याची बहुतेकांना एव्हाना कल्पना आलीच असेल. तैवान हा आपल्याच देशाचा भाग आहे असा चीनचा पूर्वीपासूनचा दावा आहे. सन 1949 साली चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीच्या पार्श्वभूमीवर तैवानने आपले स्वत:चे वेगळे अस्तित्व कायम राखत आपल्या देशात कम्युनिस्ट विचारसरणीचा थारा लागू दिला नाही.
तैवानने त्यांच्या देशात लोकशाही जोपासली आहे. तेव्हापासून चीन त्यांचा घास घेण्यासाठी टपलेला आहे. वर नमूद केल्यानुसार चीनकडे आता मोठे लष्करी व आर्थिक सामर्थ्य आल्याने त्यांना तैवानचा ताबा घेण्याचा आपला मनसुबा पूर्ण करायचाच आहे. ही आयती संधी त्यांना आता चालून आल्याने ते ही संधी वाया जाऊ देणार नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तैवान प्रकरणाला तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप येण्याचाही मोठा धोका आहे. तैवानचे रक्षण करणे ही अमेरिकेची जबाबदारी ठरली असल्याने भविष्यात चीन आणि अमेरिका अशीच लढाई होईल, असे भाकित वर्तवले जाऊ लागले आहे.
तसे झाले तर ते जगापुढील आणखी एक मोठे संकट असणार आहे. जगाला या संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न कोणी अजून हाती घेतलेला दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण जगासाठी पुढील काही काळ हा धास्तीचाच असणार आहे.चीनने अजून तैवान सीमेवर सुरू ठेवलेला युद्ध सराव ही त्याची नांदी आहे.