भाजपला आपापल्या पाठीराख्यांना निवडणुकांपूर्वी सुरक्षित स्थळी ठेवणे भाग पडत आहे. सत्तेमुळे कॉंग्रेसमधील सर्व दोष भाजपमध्ये उतरू लागले आहेत, असे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.
“देशातील लोकशाही संपुष्टात आली असून, देश हुकूमशाहीच्या मार्गावर निघाला आहे. महागाई, बेरोजगारी हे जनतेशी निगडित विषय मांडून केंद्र व भाजपच्या हुकूमशाहीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यांना अटक करून तुरुंगात डांबले जाते’, असा घणाघाती प्रहार कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेसने देशभर जनतेच्या समस्या घेऊन आंदोलन केले आणि त्यात सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांनी भाग घेतला. भाववाढीने त्रस्त झालेल्या जनतेचे दुःख कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर मांडले आणि स्वतःला अटक करून घेतली.
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी, या प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधी यांना भ्रष्टाचार करण्याची भीती वाटत नाही, असा थेट आरोप केला. परंतु देशात विविध राज्यांमध्ये भाजपच्या सरकारमध्येही भ्रष्टाचाराची प्रकरणे घडलेली आहेत. कर्नाटकात अलीकडेच ज्येष्ठ मंत्री ईश्वरप्पा यांना अशाच आरोपावरून राजीनामा द्यावा लागला. सरकारी कामे मिळवताना पैसे मागितले जातात, असा थेट आरोप ठेकेदारांनी केला होता. उत्तर प्रदेशात काही अधिकाऱ्यांवर, ते लाच घेत असल्याच्या संशयावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कारवाई करावी लागली. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनच गचांडी देणे भाग पडले होते.
कॉंग्रेसमध्ये जशी अंतर्गत गटबाजी असते, तशीच भाजपमध्येही असून, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा गेल्याच आठवड्यात बिहारमध्ये गेले असताना भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी झाली होती. नवी दिल्लीतील भाजपमधील मतभेद अधूनमधून चव्हाट्यावर येत असतात. या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्याच आठवड्यात पार पडल्या असून, त्या निमित्ताने पक्षातील विविध गटांमधील मतभेद बाहेर आले आहेत. या निवडणुकांत ज्या काहीजणांचा पराभव झाला, त्यांनी शिवराजसिंग चौहान सरकारमधील काही मंत्री व मोजक्या केंद्रीय मंत्र्यांनी आपला पराभव घडवून आणला, त्यासाठी या मंडळींनी कॉंग्रेसला मदत केली, असा थेट आरोप केला आहे.
51 जिल्हा पंचायतींचे अध्यक्ष पदांवरील व्यक्तींची निवडणूक झाली. भाजपने समर्थन दिलेले उमेदवार 41 ठिकाणी अध्यक्षपदी निवडून आले. आठ ठिकाणी कॉंग्रेसला विजय मिळाला आणि दोन ठिकाणी अपक्ष उमेदवारांना. डिंडोरी येथून यापूर्वी दोनवेळा ज्योती प्रकाश धुर्वे यांचा विजय झाला होता. भाजपचे माजी राज्यमंत्री ओम प्रकाश यांच्या त्या पत्नी. यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला आहे. केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी आपला पराभव घडवून कॉंग्रेसच्या पदरात विजयाचे दान टाकले, असा आरोप ज्योती धुर्वे यांनी केला आहे. उलट ज्योती धुर्वे यांनी पक्ष धोरणाशी सुसंगत व्यवहार केला नाही, असा आरोप कुलस्ते यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दामोद येथील जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष शिवचरण पटेल हे केंद्रीय मंत्री आणि दामोहचे खासदार प्रल्हादसिंग पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. राज्याचे सार्वजनिक बंधकाममंत्री गोपाल भार्गव यांनी पक्षाशी दगाबाजी करून, कॉंग्रेसच्या उमेदवाराला विजय मिळवून दिला, असा आरोप शिवचरण पटेल यांनी केला आहे. हर्दा येथून कॉंग्रेसच्या रेवा पटेल यांचा विजय झाला आहे. त्यात त्यांच्या चुलतभगिनी आणि राज्यमंत्री कमल पटेल यांचा हात असल्याचा आरोप आहे. ठिकठिकाणी असे आरोप केले जात असून, याची पक्ष दखल घेणार आहे आणि या तक्रारींचे विश्लेषण करणार आहे, असे भाजप सरचिटणीस भगवानदास सबनानी यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांत भाजपने प्रमुख प्रतिस्पर्धी कॉंग्रेससह अन्य पक्षांवर मात केली असून, त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजपला याचा फायदा होऊ शकतो. परंतु 2014 मध्ये विविध पालिकांच्या महापौरांच्या निवडणुकांत भाजपला जसा एकतर्फी कौल मिळाला होता, तसा यावेळी मिळालेला नाही. याचे कारण, सोळापैकी नऊच ठिकाणी भाजपला यश मिळाले असून, कॉंग्रेसला गेल्यावेळी शून्य मिळाले होते, तर यावेळी पाच ठिकाणी महापौरपद मिळाले आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने एका नगरपालिकेतील महापौरपद प्राप्त केले आहे. पक्षांतर्गत भांडणे, चुकीच्या उमेदवारांची निवड आणि अती आत्मविश्वास भाजपला नडला असल्याचे सांगण्यात येते.
5 ऑगस्ट रोजी ग्वाल्हेर महापालिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. त्यापूर्वी भाजपला आपल्या 34 नगरसेवकांना दिल्लीला हलवणे भाग पडले. कोणी ना कोणी बंडखोरी करील, असा पक्षाच्या धुरिणांना संशय आला होता. मला पुरेशी मते मिळू नयेत म्हणून कुलस्ते यांनी कसे प्रयत्न केले, याची तक्रार ज्योती धुर्वे यांनी थेट मुख्यमंत्री चौहान आणि प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्याकडे केली आहे. या उलट, ज्योती धुर्वे यांनी निवडणुकीसाठी पक्ष संघटनेस विश्वासात घेतले नाही आणि एकट्यानेच प्रचार केला, असा आरोप डिंडोरीचे जिल्हाध्यक्ष नरेश राजपूत यांनी केला आहे. ज्योती धुर्वे यांचा एक व्हिडिओही व्हायरल करण्यात आला असून, त्यात त्या राजपूत यांना धमकावत असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव व्हावा म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री गोपाल भार्गव, माजी अर्थमंत्री जयंत मालवीय आणि महसूलमंत्री गोविंदसिंग राजपूत यांनी प्रयत्न केले, असा आरोप दामोह येथील भाजपचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष शिवचरण पटेल यांनी केला आहे. थोडक्यात, अनेक ठिकाणी मध्य प्रदेश भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांत सुसंवाद नसून, उलट परस्परांवरील संशय बळावला आहे.