मॅंचेस्टर :– ऋषभ पंतचे शतक व हार्दीक पंड्याने केलेल्या अष्टपैलु खेळाच्या जोरावर भारताने यजमान इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
इंग्लंडने विजयासाठी दिलेले आव्हान भारताने 42.1 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केले व सहज विजयाची नोंद केली. भारताच्या डावाची सुरूवात अत्यंत खराब झाली. संघाच्या 13 धावा झालेल्या असताना सलामीवीर शिखर धवन अवघी एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर 17 चेंडूत 4 चौकारांसह 17 धावावंर खेळत असलेला कर्णधार रोहित शर्माही बाद झाला. पाठोपाठ सातत्याने अपयशी ठरत असलेला विराट कोहलीही याच धावसंख्येवर तंबूत परतला.
भरवशाचा मानला जात असलेल्या सूर्यकुमार यादवने साफ निराशा केली. त्यानंतर मात्र, पंतने हार्दीक पंड्याला साथीला घेत डाव सावरताना शतकी भागीदारी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. या दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर पंड्या धावांचा वेग वाढवण्याच्या प्ररयत्नात 71 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 55 चेंडूत 10 चौकार फटकावले. तो बाद झाल्यावर पंतने आपले शतक साकार केले. त्याने रवींद्र जडेजाच्या साथीत अखंडीत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय साकार केला.
पंतने डावाच्या 42 व्या डेव्हीड विलीने टाकलेल्या षटकात सलग पाच चेंडूंवर पाच चौकार फटकावताना इंग्लंडचा पराभव निश्चित केला. त्याने नाबाद 125 धावांची खेळी करताना 113 चेंडूंचा सामना करत 16 चौकार व 2 षटकार फटकावले. जडेजाने नाबाद 7 धावा देत पंतला सुरेख साथ दिली. या जोडीने 43 व्या षटकांत 5 गडी गमावून 261 धावा करत या सामन्यासह भारताचा मालिका विजयही साकार केला. इंग्लंडकडून नवोदित रीस टोप्लेने सर्वाधिक 3 गडी बाद केले. ब्रायडन कार्स व क्रेग ओव्हरटर्न यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
.@RishabhPant17 played a fantastic match-winning knock and was our top performer from the second innings of the third #ENGvIND ODI. 👏 👏 #TeamIndia
A summary of his knock 🔽 pic.twitter.com/8YqskQkWH7
— BCCI (@BCCI) July 17, 2022
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. हार्दीक पंड्या, यजुवेंद्र चहल, महंमद सिराज व रवींद्र जडेजा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडला 259 धावांवर रोखले. इंग्लंडचा डाव 46 व्या षटकांत 259 धावांवर संपूष्टात आला.
भारताकडून चहलने इंग्लंडचे शेपूट गुंडाळताना 3 गडी बाद केले. पंड्याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. सिराजने 2 तर जडेजाने 1 बळी घेतला.