मुंबई – विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला चेकमेट केले आहे. यानंतर राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार संकटात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आणखी काही नेते गुजरातकडे रवाना झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच मुद्दयावर आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्टिटची सध्या सोशलमीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नॉट रिचेबल होण्यावर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे सध्या कुठे आहेत हे सांगावं लागत नाही, त्याला काय नॉट रिचेबल असे म्हणायचं का असा सवाल केला होता.
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 21, 2022
दरम्यान, आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक ट्विट केले असून याव्दारे त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आठवण करून दिली आहे. नारायण राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये,शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. असे म्हटले आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.