पिंपरी (प्रतिनिधी) – थेट एटीएमचवर डल्ला मारण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत केवळ चिखली व आसपासच्या परिसरात चोरट्यांनी आठ वेळा एटीएमला निशाना बनविले आहे. एटीएमच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलिसांनी वारंवार बॅंकांना केल्या असल्या तरी बॅंका मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. सोमवारी पहाटे देखील चोरट्यांनी कुदळवाडी येथील एका एटीएममध्ये थेट गॅस कटरने चोरीचा प्रयत्न केला आणि लाखो रुपयांच्या नोटा जळाल्या.
चोरट्यांनी चिखली परिसरात वेगवेगळ्या बॅंकांचे आठ एटीएम फोडले. त्यातील तीन घटनांमध्ये चोरटे रोकड पळवू शकले. तर तब्बल 22 लाख 98 हजार 600 रुपये रोख रक्कम तीन घटनांमध्ये चोरीला गेली आहे. एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी केलेले प्रयत्न धक्कादायक आहेत.
गॅस कटरने ऍक्सिस बॅंकेचे एटीएम कापून 11 लाखांची रोकड पळवल्याची घटना चिखलीत घडली. त्यांनतर तळवडे रोडवर आरबीएल बॅंकेचे एटीएम देखील गॅस कटरने फोडून सात लाख 99 हजार 900 रुपये रक्कम चोरून नेली. नुकतीच कुदळवाडी येथे एचडीएफसी बॅंकेचे एटीएम फोडताना देखील चोरट्यांनी हीच पद्धत वापरली. सीसीटीव्ही कॅमे-यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापले आणि तीन लाख 98 हजार 700 रुपये रोख रक्कम चोरून नेली.
म्हेत्रेवस्तीमध्ये आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएमची तोडफोड करून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना एटीएम पूर्णपणे फोडता न आल्याने त्यांचा डाव फसला. यावेळी चोरट्यांनी एटीएम सेंटरच्या बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा रस्त्याच्या दिशेला फिरवला. शिवतेजनगर येथे युनियन बॅंकेचे एटीएम चोरटयांनी फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरु असताना बॅंकेच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली.
बॅंकेच्या नियंत्रण कक्षातून शिवतेज नगर येथील युनियन बॅंकेच्या एटीएम सेंटरमधील सायरन वाजवला. अचानक सायरन वाजल्याने चोरटयांनी धूम ठोकली. त्यामुळे एटीएम मधील 17 लाखांची रोकड सुरक्षित राहिली. चिखली प्राधिकरण मध्ये रत्नाकर बॅंकेचे एटीएम तोडून पैसे चोरण्याचा प्रकार झाला. तळवडे येथे महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमचा डिस्प्ले युनिट आणि कॅश डोअर फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न झाला.
दोन महिन्यांपूर्वी घडवून आणला होता स्फोट
मागील दोन महिन्यांपूर्वी त्रिवेणीनगर येथे चोरट्यांनी जिलेटीनचा स्फोट करून कॅनरा बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. चिखली परिसरात घडणा-या घटना पोलिसांची डोकेदुखी वाढवणा-या आहेत.
बॅंक प्रशासन ढिम्म
एटीएम मध्ये चोरी झाल्यानंतर संबंधित बॅंकेने पोलिसात तात्काळ तक्रार देण्याची तसदी देखील बॅंका घेताना दिसत नाहीत. एटीएम सेंटरच्या सुरक्षा आणि देखभालीचे कंत्राट बॅंकांनी एखाद्या एजन्सीला दिलेले असते. एटीएमचा विमा काढलेला असतो त्यामुळे बॅंक प्रशासन ढिम्म राहते. तसेच अशा घटना घडल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून एटीएम सेंटरची पाहणी केली जाते.
रकमेची मोजणी केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नसल्याचे देखील एक कारण समोर येते. सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखभालीकडे देखील दुर्लक्ष केले जाते. एटीएम सेंटरमध्ये काही इंचांचे खिळे लावून वरच्यावर एटीएम ठेवल्याने चोरटे अगदी सहज एटीएम ओढून चोरून नेऊ शकतात. असे प्रकारही शहरात घडले आहेत. त्यामुळे एटीएम सेंटर सुरु करताना त्याच्या फाउंडेशनसह सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षकापर्यंत सर्व प्रकारचे निकष पाळणे गरजेचे आहे.