नवी दिल्ली – महागाई जास्त असल्यामुळे भारतासह जगातील शेअर बाजाराचे निर्देशांकात कोसळत आहेत. अशातच भारतातील किरकोळ महागाई किंचित कमी झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र तरीही रिझर्व बॅंकेने ठरविलेल्या अपेक्षित दरापेक्षा महागाईचा दर जास्त आहे. त्यामुळे आगामी काळातही रिझर्व बॅंक महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 7.04 टक्के इतका नोंदला गेला आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 7.49 टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात मात्र महागाई बरीच नियंत्रणात होती. त्या वेळी महागाईचा दर 6.3 टक्के इतका होता. सरकारने म्हटले आहे की या वर्षी मे महिन्यामध्ये अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्यामुळे एकूण महागाईचा दर काही प्रमाणात कमी झाला आहे.
मात्र रिझर्व्ह बॅंकेने किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर चार टक्क्यांच्या आत रोखण्याचा संकल्प केला असताना गेल्या अनेक महिन्यापासून किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
त्याचबरोबर गेल्या सात महिन्यांपासून या महागाईचा दर सहा टक्क्यापेक्षा जास्त आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये अन्नधान्याची महागाई कमी होऊन 7.97 टक्के इतकी झाली आहे.
या अगोदरच्या महिन्यात ही मागणी 8.31 टक्के इतकी होती. महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गेल्या एक महिन्यांमध्ये रेपो दरामध्ये 0.90 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पत धोरणामध्ये या वर्षी मागायचा दर 6.7 टक्के राहील असे म्हटले आहे. मात्र आज जाहीर झालेला दर त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे आगामी काळातही रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्यासह भांडवल सुलभता कमी करण्यावर भर देण्याची शक्यता आहे.