पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक कधी होईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शहरातील राजकीय वातावरण आतापासून तापण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी शहरातील मोठ्या राजकीय पक्षांसह लहान पक्षांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी, राजकीय मेळावे, जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे महापालिका निवडणुकीसाठी आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आरक्षणामुळे अनेक प्रस्थापित देखील अडचणीत आले आहेत. आघाडी झाल्यास अनेक इच्छुकांना तिकिटे मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी शहरातील आम आदमी पार्टी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या इतर राजकीय पक्षांना मोठे महत्व येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, अशी भूमिका राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मंत्र्यांसह विरोधी भाजपची आहे. ओबीसी समाजाला मध्य प्रदेशाच्या धर्तीवर कशा पध्दतीने राजकीय आरक्षण देता येईल, यासाठी समर्पित आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगामार्फत ओबीसी मतदारांची संख्या आणि त्यांची माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाने ज्या ठिकाणी पाऊस कमी तेथे निवडणुका घ्या, असा आदेश दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. प्रभाग रचना, आरक्षणांचे काम पूर्ण झाले असून मतदार याद्याचाही कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, प्रभागांची झालेली मोडतोड आणि विद्यमान नगरसेवकांच्या जागी महिलांचे पडलेले आरक्षण यामुळे अनेक नगरसेवकांची अडचण झाली आहे.
नगरसेवक आमच्या संपर्कात
तिन्ही पक्षांची आघाडी झाल्यास पिंपरी विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी, आरपीआय, चिंचवड आणि भोसरीमध्ये आम आदमी पक्ष व मनसे सारख्या लहान पक्षांना मोठे महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक लहान पक्षांकडे जाण्याचा मार्ग पत्कारतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर आम आदमी पक्षाने यापूर्वीच 10 ते 15 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला.
जागा कमी, इच्छुक अधिक
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी या तीन पक्षांची आघाडी होते की नाही? यावरून देखील महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांचे भवितव्य अंवलबून आहे. तीन पक्षांच्या इच्छुकांची संख्या मोठी असून अनेकांना उमेदवारी मिळणे मोठे जिकरीचे ठरणार आहे. तसेच तीनचा प्रभाग झाल्याने प्रत्येक प्रभागातील एका नगरसेवकाची अडचण झाली आहे. त्याचप्रमाणे भाजपमधीलही इच्छुक आणि नाराजांची संख्या अधिक आहे. सर्वांनाच उमेदवारी मिळणे शक्य नाही. पक्षबदल करुनही मुख्य प्रवाहातील पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास काहींना अपक्ष तर काहींनी इतर पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी केली असल्याची चर्चा सुरू आहे.