नागपूर : स्वातंत्र्याचा लढा असो वा दुष्काळ, कोरोना सारखी महामारी असो वा देशावर आक्रमण. सामान्यांच्या पोटाची भूक भागवणारा एक कारखाना या देशातील श्रमशक्ती अर्थात शेतकरी सदैव चालवीत असतो. या श्रमशक्तीचा सन्मान करण्याचे महान कार्य फेटरी येथील जनतेने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय,युवक व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केले. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या श्रमशक्तीचा सन्मान म्हणून शेतकऱ्यांचे पुतळे उभे राहिले पाहिजे, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री सुनील केदार यांच्या प्रेरणेतून ‘देशाचा पोशिंदा शेतकरी’ हा पुतळा ग्रामपंचायत फेटरी येथे उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण त्यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री केदार म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. देशभक्तीने प्रेरित होऊन अनेक शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यासोबत देशाला अन्न धान्याचा पुरवठा नियमित चालू ठेवला. कोरोना महामारीच्या काळात सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले असतांना शेतकऱ्यांचा व्यवसाय नियमित होता. अशा शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. असेच पुतळे राज्यातही उभारुन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
देशाची आर्थिक घडी बसविण्यात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने हा देश उभा केला आहे. या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना मानाचे स्थान मिळावे हा यामागचा उद्देश असल्याचे मंत्री केदार यांनी यावेळी सांगितले.