औरंगाबाद – शिवसेनेने संजय राऊत यांची राज्यसभेची जागा छत्रपती संभाजी राजे यांना देऊ केली असती तर शिवसेनेचा छत्रपती शिवरायांच्या घराण्याविषयी आदरभाव दिसून आला असता. पण त्यांनी तसे केले नाही त्यामुळे संभाजी राजेंविषयी शिवसेनेने योग्य भूमिका घेतलेली नाही अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
10 जून रोजी राज्य विधानसभेतून राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. भाजपकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळावर ते राज्यसभेच्या दोन जागा जिंकू शकतात, तर महाराष्ट्रातील सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी एक जागा जिंकू शकते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. या जागी सर्व पक्षीय उमेदवारी मिळवण्यासाठी संभाजी राजे प्रयत्नशील आहेत. पण शिवसेनेने मात्र त्यांना पक्षात प्रवेश करण्याची अट घातली आहे.
आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कोणालाही पाठिंबा देणार नाहीं असे शिवसेनेने म्हटले आहे. कोल्हापूरच्या राजघराण्याचे सदस्य असलेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे हे यापूर्वी राज्यसभेचे राष्ट्रपती-नामनिर्देशित सदस्य होते.त्यांनी नुकतीच राज्यसभेची पुढील निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा केली आहे आणि सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.