श्रीकांत कात्रे
महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे इथला सर्वसामान्य माणूसही सारासार विचार करून परिवर्तनाची दिशा निश्चित करू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील घटनेने ते सिद्ध केले आहे. हेरवाडचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी विधवा महिलांच्या अनुषंगाने घेतलेला निर्णय असाच दिशा देणारा ठरणार आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने 5 मे 2022 रोजी विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार हेरवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर व सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने केला.
आता याच पॅटर्नची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाडचा आदर्श घ्यावा, असे परिपत्रक राज्य सरकारने बुधवारी जारी केले. हेरवाडसारख्या छोट्या गावाने एक महत्त्वपूर्ण विचार यानिमित्ताने देशाला दिला आहे. विधवांची अवहेलना थांबविण्यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी विधवांसंदर्भात असणाऱ्या अमानुष प्रथांविरोधात बदल घडविण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले. तरीही विधवांचा मानसिक छळ होईल अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला जोडलेल्या अनेक कुप्रथा अजूनही जिवंत आहेत.
“पांढऱ्या कपाळा’ची म्हणून तिला दूषणे दिली जात होती. कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात तिला स्थान मिळायचे नाही. हळदीकुंकू यासारख्या समारंभापासून सर्व प्रकारच्या धार्मिक विधींसाठी तिचा सहभाग किंवा उपस्थितीही नाकारली जायची. जिवंतपणी मरण अनुभवण्याचा प्रकार तिला मिळत होता. तिचे अस्तित्वच नाकारले जायचे. तिही मनुष्य आहे आणि तिलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे अनेकांच्या गावीही नसायचे. नेहमीच उपेक्षित राहणाऱ्या या विधवांना सन्मान देण्यासाठी हा वेगळा विचार उपयुक्त ठरणार आहे. पतीच्या निधनानंतर एकाकी जगण्याची वेळ तिच्यावर येते त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी तिला समानतेची किंवा सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, एवढी माफक अपेक्षाही पूर्ण व्हावी, असे वातावरण नव्हते.
आता मात्र हे बदल व्हायला हवेत, यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी असा ठराव करून निर्णयाला बळकटी दिली पाहिजे. शासकीय पातळीवर आदेश काढण्यात आले आहेत. पण केवळ आदेशाने असे परिवर्तन घडत नाही. लोकांची मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या मनाची मशागत त्या पद्धतीने व्हायला हवी. तिच्याशी आपुलकीचे वर्तन करणे मनापासून घडणे महत्त्वाचे आहे. साऱ्या जगभर दोन वर्षांपासून करोनाचे संकट होते. या संकटाचे अनेकविध परिणाम जग सोसत आहे. त्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या घरातील कर्त्या पुरुषांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच सध्याही अशा महिलांना अशा अनेक कुप्रथांना तोंड द्यावे लागत असेल. या पार्श्वभूमीवर हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्यासाठी केलेली कृती खूप काही शिकवणारी आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात झालेला हा निर्णय स्वागतार्ह आहेच. आता फक्त त्याची अंमलबजावणी कशी होणार याबाबतची प्रतीक्षा आहे.
केवळ निर्णय घेऊन विधवांच्या कुप्रथा बंद होतीलच अशी खात्री देता येत नाही. तिला पुरेसे मानसिक, शारीरिक, आर्थिक संरक्षण मिळण्याची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने शासनासह सर्वच पातळ्यांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. आत्मनिर्भर होऊन तिने अवहेलनाविरहित जीवन जगायचे असेल, तर शासनासह समाजाने तिच्याबरोबर उभे राहून तिला तिचे जगणे समर्थ करण्यासाठी पावले उचलायला हवीत. तरच हा निर्णय सार्थकी लागणार.