नवी दिल्ली, दि. 19 – सरकार संसदेपुढे पुन्हा अंतर्गत सुरक्षा कायदा विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री ब्रह्मानंद रेड्डी यांनी दिली. या विधेयकात सरकारला काही बदल करायचा असे नसून विरोधी पक्षीयांनी संसदेच्या शेवटच्या दिवशी ते विधेयक मांडू दिले नव्हते.
वृत्तपत्र कागदाच्या पुरवठ्यात वाढ
नवी दिल्ली – गेल्या वर्षीच्या कोट्यापेक्षा 20 टक्के जादा वृत्तपत्र कागद पुरविण्याचे सरकारचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. 75-76 सालचे आपले धोरण जाहीर करताना माहिती व नभोवाणीमंत्री गुजराल यांनी ही माहिती दिली. नव्या वृत्तपत्रांना व मासिकांना फायदा व्हावा म्हणून काही नियमांत सूट देण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयांच्या मासिकांसाठीही वृत्तपत्र कागद पुरविण्यात येणार आहे.
देहांत शिक्षा रद्द करा
नवी दिल्ली – देहांत शिक्षा ही कायद्यानुसार दिली जावी अशी तरतूद असली, तरी भगवान महावीरांच्या 2500 निर्वाण दिनाच्या निमित्ताने भारत सरकारने देहांताची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी जनसंघाचे अध्यक्ष अडवानी व खासदार अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे आज केली आहे.
धनिकांना रेशनवर गहू देणार नाही?
मुंबई – स्वस्त धान्य दुकानांतून देण्यात येणारा गहू ज्यांचे मासिक उत्पन्न एक हजार रुपये अथवा त्यापेक्षा जास्त आहे अशांना रेशनवर देऊ नये, यावर आमदारांच्या एका समितीत विचार चालू आहे. मात्र याबाबत सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. ग्रामीण भागात जादा धान्य पुरवठा करण्यासाठी हा विचार चालू आहे. हा विचार अंमलात आल्यास धनिकांना रेशनवर गहू मिळणार नाही.