पिंपरी – प्रशासकीय गतिमानतेचा पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी ऍपवरच सध्या प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. शहरातील तक्रारी ऑनलाइन नोंदविण्यासाठी व त्यांचा निपटारा त्वरित व्हावा, यासाठी “सारथी ऍप’ची निर्मिती करण्यात आली. मात्र, दिवसेंदिवस या ऍप्लिकेशनच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. त्यावरील तक्रारी न सोडविताच बंद करणे, त्या डिलीट करणे, तसेच केलेली तक्रार ऍपवर दिसत नसल्याचेही प्रकार घडत आहेत. यामुळे प्रशासन समस्या सोडविण्याऐवजी तक्रार गायब करण्यावरच भर देते की काय असा प्रश्न नागरिक विचारु लागले आहेत.
नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी खुले व्यासपीठ मिळावे व तक्रारींचा त्वरित निपटारा व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे सारथी ऍप सुरू करण्यात आले. या ऍपची सुरवातीला खूप चर्चा झाली. तसेच तक्रारींची त्वरित दखल घेतली जात असल्याने नागरिकही समाधानी होते. मात्र, कालांतराने या ऍपवर केलेल्या तक्रारी काम न करता बंद केल्या जातात आहेत. तक्रारींचे टोकन नंबर अनेकदा येत नाहीत. ऍपवरील तक्रारी काही कालावधीनंतर ऍपवर दिसत नाहीत. तसेच सारथीवर कधी टोकन नंबर येत नाही, कघी सिस्टीम डाऊन असते. तर कधी टोकन आपोआप बंद होतात तर कधी तक्रारी आपोआप गायब होत आहेत.
या विषयी तक्रारदार प्रशांत राऊळ म्हणाले की, सारथीविषयी माहिती तंत्रज्ञान विभाग आणि आयुक्तांना ई-मेलद्वारे सारथी बद्दल केलेल्या तक्रारींना प्रतिसाद दिला जात नाही. 16 आणि 28 एप्रिल आणि 14 मे रोजी 2 तक्रारी केल्या होत्या. त्या सोडविलेल्या नाहीत. तसेच त्या ऍपवरही सध्या दिसताच नाहीत. तर सिस्टिम काम करत नाही, असे सारथीच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
एखादी तक्रार सोडविण्यास सांगितल्यानंतर ती संगणक प्रणालीतून निरस्त (क्लोज) केली जाते. मात्र, अनेकदा संबंधितांपर्यंत तक्रार सोडविण्याचा निरोप मिळत नाही. त्यामुळे असे घडत असावे. या संदर्भात आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे परिपत्रक काढून संबंधित तक्रारदारांशी संपर्क साधल्याशिवाय व तक्रारीचे निवारण केल्याशिवाय तक्रार निरस्त करू नये, असे सांगितले आहे.
– एस. एस. पवार, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, सारथी.