वडगाव मावळ – मागील आठवडाभरात टोमॅटोच्या दरात दुप्पटीने वाढ झाली असून सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री 50 रुपये प्रति किलोने केली जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, वाढता मजूरीचा खर्च आणि त्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होत असून बाजारात टोमॅटोची आवक 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे त्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
सध्या टोमॅटोची आवक पुणे व ग्रामीण भागातून होत आहे. परंतू, मागील काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. आठवड्याभरापूर्वी घाऊक बाजारात 25 रुपये प्रति किलोने विकले जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात थेट दुपटीने वाढ झाली असून सद्यस्थितीला 50 रुपये प्रति किलोने टोमॅटो विक्री केले जात आहेत.
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यात, उत्पादन करणाऱ्या मजुरांनीही मजुरीचे दर वाढविले आहेत. त्यामुळे अनेकांनी टोमॅटोच्या उत्पादन घेण्याचे कमी केले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. त्यात, दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळेही पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अधिच उत्पादनात घट आणि त्यात तापमानाची भर पडत असल्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक रोडविल्याचे चित्र आहे. आठवड्याभरात बाजारात टोमॅटोची आवक 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे.
परंतु, किरकोळ बाजारात याचा फायदा घेऊन सर्रासपणे ग्राहकांच्या पैशांची लुट केली जात आहे. आठवड्याभरापूर्वी किरकोळ बाजारात 20 रुपये प्रति किलोने विक्री केले जाणारे टोमॅटो सध्या 50 रुपये प्रति किलोने विक्री केले जात आहेत.