नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांत देशातील अनेक सरकारी शाळांना टाळे ठोकण्यात आले होते. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (UDISE रिपोर्ट 2018-19) प्लस डेटानुसार, देशातील सरकारी शाळांची संख्या कमी झाली आहे. तर खासगी शाळांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे करोना महामारीच्या काळात खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमध्ये जास्त प्रवेश झाल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. साथीच्या आजारामुळे अनेक पालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना खासगी शाळांमधून काढून सरकारी शाळेत घातले.
यूडीआयएसईच्या 2018-19 च्या अहवालानुसार देशातील 50 हजारांहून अधिक सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, 2018-19 मध्ये सरकारी शाळांची संख्या 1,083,678 वरून 2019-20 मध्ये 1,032,570 वर आली आहे. म्हणजेच देशभरात 51,108 सरकारी शाळा कमी झाल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांच्या संख्येत 26047 शाळांची घट झाली आहे. सन 2018 मध्ये, येथील शाळांची संख्या सप्टेंबरमध्ये 163,142 होती जी सप्टेंबर 2020 मध्ये कमी होऊन 137,068 झाली. तर मध्य प्रदेशात शाळांची संख्या 22,904 पर्यंत घसरली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये येथील शाळांची संख्या 122,056 होती जी सप्टेंबर 2020 मध्ये घटून 99,152 झाली.
या अहवालानुसार, बिहार आणि बंगाल ही दोन राज्ये आहेत जिथे खाजगी शाळांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. यूडीआयएसई (UDISE) हे शालेय शिक्षण विभागाचे एक युनिट आहे, जे दरवर्षी शाळांशी संबंधित डेटा प्रदान करते.