नवी दिल्ली – उदयपूरमध्ये 13 ते 15 मे या कालावधीत होणाऱ्या चिंतन शिबिरामुळे काँग्रेसमध्ये कितपत परिवर्तन होईल, हे येणारा काळच सांगेल, मात्र पक्षात काही मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस ‘एक कुटुंब, एक तिकीट’चा फॉर्म्युला राबवू शकते. याशिवाय ‘एक व्यक्ती एक पद’ असा नियमही करता येणार आहे. तसेच काँग्रेसच्या समित्यांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि महिलांना ५० टक्के वाटा देण्यात यावा. काँग्रेस समित्यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी निश्चित करण्यात यावा, असे प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या संघटना व्यवहार समितीने चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर तयार केले आहेत.
दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संघटना समितीचे सदस्य यांच्या म्हणण्यानुसार, किमान पाच वर्षे संघटनेसाठी काम करणाऱ्या नेत्यांसाठी ‘एक कुटुंब एक तिकीट’ या नियमात विशेष तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘एक कुटुंब एक तिकीट’ असा नियम असतानाही काँग्रेस हायकमांडमधील एकापेक्षा जास्त व्यक्ती म्हणजेच गांधी कुटुंबीयांना निवडणूक लढवता येणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या वेळी पॅराशूट एंट्री करणाऱ्या नेत्यांच्या मुला-मुलींसाठी हा नियम आणला जात आहे. मात्र कुटुंबाव्यतिरिक्त कोणताही नेता संघटनेत सक्रिय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असंही सूत्रांनी सांगितले.
भाजपकडून काँग्रेसवर सतत परिवारवादाचा आरोप करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा गांधी घराण्यावर यावरून टीका केली आहे. मात्र आता काँग्रेसने परिवारवादाच्या आरोपातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.