मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली आहे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. तसेच आम्ही न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केले नसल्याचे देखील स्पष्टीकरण राणा दाम्पत्यांनी दिले आहे.
आमदार रवी राणा यांनी मुंबईतील खार निवासस्थानाहून दिल्लीकडे जाताना माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
रवी राणा म्हणाले, जो आमच्यासोबत अन्याय केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महिला खासदारला वागणूक दिली आहे. पूर्ण पोलीस विभागाच गैरवापर केला आहे. अत्यंत वाईट अशी वागणूक देणारे राज्याचे मुख्यमंत्री द्वेषी, खुन्नस आणि अहंकारी असे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या कारवाईची तक्रार दिल्लीमध्ये करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज पालिकेचे पथक मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे पाठवले आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, माझा एकच फ्लॅट मुंबईला आहे. त्याची चौकशी ऑनलाईन करून घ्या, काही अडचण असेल तर अनिल परब, संजय राऊत हे तुमचे डावे आणि उजवे खाली बसले आहेत. त्यांना पाठवा आणि चारही कोपरे बघून घ्या, मोजमाप करा, असा टोलाही त्यांनी लगाविला.
विशेषाधिकार समिती करणार चौकशी
खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारविरोधात केलेल्या तक्रारीवर 23 मे रोजी संसदेच्या विशेषाधिकार समिती सुनावणी करणार आहे. यासाठी समितीने खासदार नवनीत राणा यांना चौकशीसाठी बोलवले आहे. नवनीत राणा यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल लोकसभा अध्यक्षांनी घेतली असून याची संसदेच्या विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.