औरंगाबाद – औरंगाबादेतील बायजीपुरा भागात किरकोळ कारणावरून मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहरूख अन्वर शेख (वय 18) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर हैदर असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि त्याचा मित्र हैदर बायजीपुरा येथील सिंकदर हॉलसमोर बसले होते. दोघेही नशेत धुंद होते. दोघांचे अचानक संवादाचे रुपांतर वादात झाले. वाद इतका टोकाला गेला की, हैदरने शाहरुखच्या कंबर आणि पायावर धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यामुळे शाहरुखला रक्तस्त्राव सुरू झाला आणि तो जमिनीवर कोसळला. शाहरुखची स्थिती पाहून हैदर तेथून पसार झाला. जखमी शाहरुख लोकांना मदतीची याचना करत होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोक कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. शेवटी रस्त्यावरच शाहरुखने तडफडून प्राण सोडले.
या भांडणावेळी आरोपी हैदर देखील जखमी झाला होता. पोलिसांनी आरोपी हैदरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोलिसांच्या देखरेखीत शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास जिन्सी पोलीस करत आहेत.