मुंबई- सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. परंपरागत शेती सोबतच कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणिकरणासाठी अनेक विभागांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार शरद पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. दादा भुसे म्हणाले, सेंद्रिय शेतीसाठीचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल. अन्न प्रकिया व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. शेतमालाला चांगला भाव मिळावा त्याच बरोबर इतर अपारंपरिक भाजीपाल्याची ग्राहकांना ओळख व्हावी, यासाठी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही भुसे यांनी सांगितले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, सेंद्रिय उत्पादनाला योग्य ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार व पणन विभागातर्फे गृहनिर्माण संस्थांमधून जनजागृती करुन उत्पादनाविषयी माहिती दिली जाईल. याशिवाय पणन विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मसवर या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवता येईल.