मुंबई – भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एलआयसीच्या आयपीओला संस्थागत गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या गुंतवणूकदारांना उपलब्ध करण्यात आलेल्या शेअरपैकी बहुतांश शेअरची खरेदी झाली आहे. यामध्ये म्युच्युअल फंड घराण्यांनी जास्त प्रमाणात खरेदी केले असल्याची आकडेवारी उपलब्ध होऊ लागले आहे.
म्युच्युअल फंडाबरोबरच देशातील काही विमा कंपन्यांनी या शेअरची जबरदस्त खरेदी केली असल्याचे दिसून येते. डॉलर वधारला असल्यामुळे आणि रुपया कोसळला असल्यामुळे परदेशातून जास्त खरेदीची अपेक्षा नव्हती. मात्र सिंगापूर मधून या आयपीओला बरीच मागणी आली असल्याचे दिसून येते. सुरुवातीला या आयपीओच्या माध्यमातून केंद्र सरकारने 60 हजार कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले होते.
मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर आता या आयपीओच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभे करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र तरीही हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. एलआयसीच्या निर्गुंतवणूकीबरोबर आयडीबीआय बॅंक आणि इतर सरकारी बॅंकांची निर्गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मात्र रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे या प्रक्रियेचा वेळ काही प्रमाणात मंदावला आहे. मात्र या वर्षी बरीच निर्गुंतवणूक करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांना आजपासून बोली बोलता येणार
संस्थागत गुंतवणूकदारांसाठी दोन आणि तीन मेला बालीे बोलता येणार होत्या. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आजपासून म्हणजे 4 मे पासून 9 मे पर्यंत बोली बोलता येणार आहेत. आयपीओमधील शेअरच्या किमतीचा पट्टा 902 ते 949 रुपये असा ठेवण्यात आला आहे. पॉलिसीधारकांना प्रतेक शेअरला 60 रुपयाची तर रिटेल गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमागे 45 रुपयाची सूट देण्यात येणार आहे. पॉलिसी धारकांना आयपीओची खरेदी करता यावी याकरिता एलआयसीने दोन महिन्यापासून पॉलिसी धारकांना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे या आयपीओची प्रक्रिया संपल्यानंतर शेअरबाजारात व्यवहार करणाऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढणार आहे.