मुंबई – महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 साली विश्वकरंडक विजेतेपद पटकावले. त्यानंतर धोनीलाच या विजेतेपदाचे श्रेय दिले गेले. मात्र, त्यावरच आता हरभजनसिंगने संताप व्यक्त केला आहे. धोनीने विजेतेपद मिळवून दिले मग आम्ही काय विटी-दांडू खेळत होतो का, असा सवालही त्याने केला आहे.
आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या एका चर्चेत महंमद कैफ व हरभजन यांच्यात संवाद होत असतानाच कैफने धोनीला विश्वविजयाचे श्रेय दिल्याने हरभजनने संताप व्यक्त केला. क्रिकेट हा खेळ सांघिक असतो, कोणी एक खेळाडू त्याचे श्रेय कसे काय घेऊ शकतो किंवा माध्यमे व काही खेळाडूदेखील धोनीलाच त्याचे श्रेय का देतात.
संघात अनेकांनी सातत्याने कामगिरी केली. सचिन तेंडुलकरचे स्वप्न साकार करताना त्याच्यासह गौतम गंभीर, युवराज सिंग यांच्याबरोबरीने सगळ्यांनीच आपापला वाटा उचलला व देशाला 1983 सालानंतर तब्बल 28 वर्षांनी विजेतेपद मिळवून दिले. जर एकट्या धोनीमुळे हे यश मिळाले असेल तर मग आम्ही संघातील अन्य खेळाडू काय विटी-दांडू खेळत होतो का, असा सवाल हरभजनने केला आहे.
भारत जिंकला असे म्हणा
जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वकरंडक जिंकतो तेव्हा विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवले असे म्हटले जाते. मग भारताने विजेतेपद मिळवल्यावर धोनीने विश्वकरंडक मिळवून दिला असे का म्हटले जाते. या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला, सपोर्ट स्टाफला तसेच मुख्य प्रशिक्षकांना व बीसीसीआयलाही दिले गेले पाहिजे व विश्वकरंडक भारताने जिंकला असेच म्हटले गेले पाहिजे, असेही हरभजनने सांगितले.