मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी मोथे आंदोलन केले. या प्रकरणावर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर सुरुवातीच्या काळात एसटी कर्मचारी आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठे विधान केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं, तेव्हा सुरुवातीच्या काळात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांसोबत होते. जवळपास दोन आठवडे या दोघांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात ठिय्या मांडून जोरकसपणे मागण्या मांडल्या. मात्र, राज्य सरकारकडून वेतननिश्चिती आणि पगाराबाबत हमीचं आश्वासन मिळाल्यानंतर या दोघा नेत्यांनी आंदोलकांना माघार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर देखील आंदोलकांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर त्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
“ज्या दिवशी आम्ही या आंदोलनातून बाहेर पडलो, २६ नोव्हेंबर २०२१ ला… तेव्हापासून परवा न्यायालयाचा निकाल येईपर्यंत.. तेव्हा जे आमचं ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काहीही पाच महिन्यांत घडलेलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. पण आम्ही प्रामाणिकपणे कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली. मी आणि सदाभाऊ खोत १६ दिवस आझाद मैदानावर आंदोलकांसोबत होतो”, असे गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.
“नंतरच्या काळात सरकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये कोणतीही सहमती झाली नाही आणि सरतेशेवटी हे आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं आहे”, अशी टिप्पणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनाविषयी भूमिका मांडली. “जे घडलं, त्याबाबतीत पोलीस यंत्रणा तपास करेल. त्यांचा तपास होईपर्यंत यावर काही बोलणं योग्य होणार नाही”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.