राज्यात एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर केलेल्या आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेले भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उदयनराजे भोसले यांनी यावेळी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “या जन्मी आपण जे कर्म करतो, ते याच जन्मी फेडावं लागतं. सगळ्यांना हे लागू होतं. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर?” असे उदयनराजे भोसले बोलले आहेत.
उदयनराजे भोसले यांनी यावेळी बोलताना, “हे पंचायत राजची संकल्पना सांगतात. जी गांधीजींनी तेव्हा मांडली होती. जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत लोकशाही देशात नांदणार नाही. काय केलं काँग्रेस-राष्ट्रवादीनं? सत्तेचं केंद्रीकरण केलं. मूठभर लोकांच्या हातात सत्ता राहिली आणि बाकीच्यांना त्यांनी सोयीप्रमाणे वापरलं. याला गुलामगिरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?” असा सवाल उपस्थित केला आहे.
“याआधी महाराष्ट्रानं अनेक मुख्यमंत्री बघितले. भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांनी चांगल्या प्रकारे धुरा सांभाळली. त्यावेळी शिवसेना बरोबर होती. मग असं काय घडलं की त्यांनी पार चिरफाड करून टाकली”, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.
“आज काय अवस्था आहे? कोण भोगतंय? कुणामुळे? आज जे सत्तेत आहेत, त्यांना ज्यांनी निवडून दिलं त्यांचाच विसर पडलाय. कारण ते आपली सत्ता टिकवण्याच्याच मागे आहेत. कोण इकडे जाईल का? कोण तिकडे जाईल का? प्रगतीचा विचार येणारच कसा? मग यातून अस्थिरता वाढत गेली”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.