22 हजार कर्मचारी बेमुदत संपावर ः नागरिकांच्या कामाचा खोळंबा
थेऊर – राज्यभरातील महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारल्याने जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय ओस पडली आहेत. त्यामुले नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला असून शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. शासनस्तरावर महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्याची दखल न घेतल्याने राज्यातील सर्व नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहायक, वाहन चालक, शिपाई व कोतवाल महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली.
नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करावे. महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादित पार पाडावी. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4600 रुपये करावा. 27 नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी. प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी या मागण्यांसाठी आज राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूलच्या 22 हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी,अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून, दोन वर्षांपासून थांबलेली नायब तहसीलदार पदोन्नती करावी,नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करावे. प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी आदी मागण्यांसाठी बेमुदत संपावर कर्मचारी ठाम आहेत. मागील अनेक दिवसांपासून रिक्त पदांची भरती करण्याची मागणी होत आहे,
आमच्या मागण्या मान्य करा…
दि. 28 मार्चला महसूल कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण करून देखील शासनाने दखल न घेतल्याने, महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.