पुणे (व्यंकटेश भोळा) – नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण लागू करण्यात येत आहे. त्यात आता तीनऐवजी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असणार आहे. देशभरात टप्प्याटप्प्याने असे अभ्यासक्रम लागू केले जातील. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी हा पूर्ण क्षमतेने पदवी घेऊन बाहेर पडणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नव्या शैक्षणिक राष्ट्रीय धोरणातील चारवर्षीय पदवी अभ्यासक्रमाचा मसुदा जाहीर केला आहे. त्यात संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय मागवण्यात आले आहेत. त्यानंतर अभ्यासक्रम लागू करण्यासाठी कार्यवाहीला सुरू होणार आहे.
जुन्या पदवीधारकांचा विचार व्हावा
सध्या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता अत्यल्प आहे. तर, नव्या अभ्यासक्रमानुसार चार वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला रोजगारक्षम बनविण्यात येणार आहे. पण, जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी कोणताही निर्णय घेतला गेलेला दिसत नाही. त्याबाबत विचार होणे गरजेचे आहे.
चारवर्षीय पदवी अभ्यासक्रमात रोजगाराभिमुख आणि संशोधन क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे या पदवीचे मूल्य वाढणार आहे. चांगले पदवीधर निर्माण होतील. मात्र, पदवीची योग्य पद्धतीने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे.
प्रा. डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, आंतरविद्या शाखीय अभ्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अशी असेल रचना
प्रवेशानंतर एक वर्ष म्हणजेच दोन सत्र (सेमिस्टर) पूर्ण केल्यास विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळेल.
दोन वर्षे म्हणजे चार सत्र पूर्ण केल्यास पदविका (डिप्लोमा) पूर्ण होईल.
तीन वर्षे म्हणजे सहा सत्र पूर्ण केल्यास त्याला पदवी मिळेल. हा विद्यार्थी आधीप्रमाणेच दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल.
विद्यार्थ्याने संपूर्ण आठ सत्र पूर्ण केल्यास त्याला चार वर्षांची पदवी मिळेल.
हा विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र असेल.