माधव विद्वांस
पैलवानी शरीरयष्टी, पिळदार मिशा अशा भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची भारतीयांनाही आणि जगालाही ओळख व आवड निर्माण करणारे उस्ताद बडे गुलाम अलीखॉं ऊर्फ “सबरंग’ यांची आज जयंती. त्यांचे पूर्वज फाजल पिरदाद हे गझनीहून कसूर येथे आले होते. 2 एप्रिल 1902 रोजी त्यांचा जन्म लाहोर जवळील कुसूर येथे झाला. त्यांचे वडील अलीबक्ष व चुलते कालेखॉं हे दोघेही प्रसिद्ध गायक होते. अलीबक्ष गायनही करीत व दिलरूबाही उत्तम तऱ्हेने वाजवीत असत.
वडील व चुलत्यांच्या तालमीत गुलाम अलीखॉं गायकीत तरबेज झाले. वर्ष 1919 मध्ये लाहोर संगीत संमेलनात पहिल्यांदा जाहीर गायन केले. आवाजातील गोडवा व सातत्याने केलेला रियाज व संगीतातील बारकावे या अभ्यासामुळे ते उत्तम तऱ्हेने गाऊ लागले. कोलकाता व अलाहाबाद येथील संगीत संमेलनातही त्यांनी गायन केले व वाहवा मिळवली. त्यांनी स्वतःच्या मैफिलीही केल्या व गायक म्हणून प्रसिद्ध झाले.
फाळणीनंतर ते पाकिस्तानमध्ये गेले; पण तेथे आपण एक वेगळे राष्ट्र आहोत, आमचा धर्म आणि स्वतःची संस्कृती आहे, असे जनतेच्या मनावर ठसविले जात होते. त्यासाठी गायन, वादन या कला क्षेत्रातही शास्त्रीय संगीतात गझलांचा जाणीवपूर्वक प्रचार केला जात होता. संस्कृत आणि हिंदी भाषेतील विविध राग-रागिणींना पाकिस्तानी नावे दिली जात होती. झेड. ए. बुखारी यांनी “राग दरिया’ या नावाने एक पुस्तक तयार केले, ज्यामध्ये सुमारे शंभर बंदिशांचा समावेश होता व त्यामध्ये बहुतेक उर्दू, पर्शियन आणि अरबी युक्त्या वापरून राग आणि रागणीतून संस्कृत आणि हिंदी शब्द काढून टाकण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. उस्ताद बडे गुलाम अलीखॉं त्यांच्या कसूर आणि पटियाला घराण्यातील गाणी म्हणत.
या घराण्यात संस्कृत आणि हिंदी शब्द आणि पद्धती वापरल्या जायच्या. शास्त्रीय संगीत हा महान भूतकाळाचा सांस्कृतिक वारसा होता व तो बदलला जात आहे, हे उस्तादांना पटले नाही. त्यामुळे बुखारी आणि उस्ताद बडे गुलाम अलीखॉं यांच्यात वाद झाला. बुखारी यांनी या एवढ्या मोठ्या कलाकाराला बाहेर बसवले आणि शिपायाला सांगितले की या इसमाला बाहेर जाऊ द्या. हे उस्तादांनी ऐकले आणि तिथेच त्यांनी ठरवलं की आता पाकिस्तानात राहायचे नाही आणि ते भारतात संगीताची सेवा करण्यास परतले. भारतात त्यांच्या गुणांची कदर झाली. महात्मा गांधींसह, पंडित नेहरू यांनी त्यांना योग्य सन्मान दिला.
के. आसिफ “मुगल-ए-आझम’ चित्रपट बनवत होते. त्यासाठी एका दृश्यात मुघल दरबारी गायक, तानसेन यांचा आवाज आवश्यक होता, त्यासाठी संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी त्यावेळचे तानसेन म्हणजे उस्ताद बडे गुलाम अलीखॉं यांना विनंती केली. बडे खॉं यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला.त्यावेळी नौशाद म्हणाले की, उस्तादांनी तत्कालीन भारतातील 45 कोटी जनतेला त्यांच्या महान कलेपासून वंचित ठेवू नये.
अखेर उस्तादांनी दोन गाणी गायली व त्यांचा आवाज सामान्य रसिकांपर्यंत पोहोचला. त्यासाठी त्यांना 25 हजार रुपये देण्यात आले, ज्यावेळी मोठे गायकही चारशे ते पाचशे रुपये घेत होते. त्यांनी गायलेल्या, का करू सजनी आए ना बालम, प्रेम जोगन बनके, नैना मोरे तरस रहे, कंकर मार जाए या ठुमरी खूप लोकप्रिय झाल्या. 23 एप्रिल 1968 रोजी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.