महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या विविध दुर्घटनांवर नजर टाकली, तर हा आठवडा या प्राणघातक दुर्घटनांमुळेच गाजल्याचे लक्षात येते. अर्थात, या सर्व दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाल्यामुळे नेहमीसारखी नंतरची चर्चा सुरू झाली आहे आणि ही दुर्घटना कशी टाळता आली असती याविषयी उलट सुलट मतेही प्रदर्शित केली जात आहेत. यापूर्वी सुद्धा देशात घडलेल्या अशा प्रकारच्या दुर्घटना पाहिल्या तर त्यापासून कोणताही बोध घेण्यात आला नसल्यानेच ही दुर्घटनांची साखळी कायम सुरू राहत असल्याचे लक्षात येते. पुण्यात एका अल्पवयीन मुलाने महागडी कार बेदरकारपणे चालवून दोघांचा बळी घेतल्याच्या घटनेपासून ही दुर्घटनांची साखळी सुरू झाली.
या दुर्घटनेची चर्चा सुरू असतानाच डोंबिवलीतील निवासी क्षेत्रामध्ये एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन अनेक लोकांचा बळी गेला. या दुर्घटनेच्या कारणांची मीमांसा सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील राजकोट येथे एका गेमिंग झोनला आग लागून 32 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला, ज्यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये एका बेबी केअर सेंटरला आग लागून सहा नवजात अर्भकांचा बळी गेला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आणखी काही ठिकाणी बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे काही जणांचा बळी गेला आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी जलाशयामध्ये बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईत भलेमोठे होर्डिंग कोसळून मोठी जीवितहानी झाली. गेल्या काही दिवसांमध्ये या घटना एकापाठोपाठ एक घडत असल्यामुळे त्याविषयीची चिंता वाटणे साहजिक आहे. म्हणूनच समाजातील सर्व स्तरांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना कशा प्रकारे टाळता येतील याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्य सरकारने एकीकडे अशा काही दुर्घटनेमध्ये बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. पण मुळातच या सर्व दुर्घटनांवर जर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की नियमांकडे केलेल्या डोळेझाकमुळे या सर्व दुर्घटना घडल्या आहेत. सतराव्या वर्षी बापाने आपल्या मुलाच्या हातात जर कारच्या चाव्या दिल्या नसत्या तर पुण्यातली दुर्घटना घडली नसती किंवा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र ज्या बारमध्ये आणि पबमध्ये आले होते तेथील व्यवस्थापनाने जर नियमाप्रमाणे या सर्वांना मद्य देणे टाळले असते तरीसुद्धा ही दुर्घटना टळली असती.
डोंबिवलीसारख्या लोकसंख्येने गच्च भरलेल्या शहरामध्ये निवासी क्षेत्रामध्येच अनेक रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या हलवण्याबाबत गेल्या कित्येक वर्षांपासून हालचाली सुरू आहेत. पण अद्यापही असा निर्णय प्रत्यक्षात न आल्यामुळेच डोंबिवलीतील या कंपनीमध्ये मोठा स्फोट होऊन अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. राजकोटमधील गेमिंग झोनमधील आगीबाबतही अशाच काही गोष्टी समोर येत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त लोकांना या झोनमध्ये प्रवेश देण्यात आला होता एवढेच नव्हे तर ऐनवेळी अशी एखादी दुर्घटना घडली तर काय करायला हवे याबाबतची कोणतीही यंत्रणा तिथे उपस्थित नव्हती. नवी दिल्लीतील बेबी डे केअर सेंटरमधील दुर्घटनेलाही असाच निष्काळजीपणा जबाबदार आहे.
एखाद्या ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यानंतर ही सर्व आग पसरण्यासाठी खरं तर काही कालावधी लागत असतो. या कालावधीमध्ये लोकांना बाहेर काढणे शक्य असते. पण यावेळी जो मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असतो त्यामुळेच या दुर्घटनांची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येते. अनेकवेळा आगीच्या दुर्घटनांमध्ये चेंगराचेंगरीमध्ये बेशुद्ध पडल्यामुळे अनेकांचा जळून मृत्यू होतो किंवा धूर सहन न झाल्यामुळे बेशुद्ध पडल्यामुळे नंतर अनेकांना होरपळून जीव गमवावा लागतो. साहजिकच आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने उपलब्ध असलेल्या मार्गाने सुरक्षितपणे कसे बाहेर पडता येईल याबाबतचे कोणतेही औपचारिक शिक्षण भारतीय लोकसंख्येला देण्यात आले नसल्यानेच अशा प्रकारच्या दुर्घटनांची तीव्रता वाढते.
वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, मद्यपान करण्याचा परवाना नसतानाही केवळ नफ्याचा हेतू समोर ठेवून अशा तरुण वयातील पोरांना मद्यपुरवठा करणे, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी अतिशय नुकसानकारक अशा उत्पादनांची निर्मिती करणे अशा सर्व कारणांमुळे या सर्व दुर्घटना घडल्याचे लक्षात येत आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर सरकार त्याची गंभीर दखल घेते आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होतात आणि पुढील कार्यवाहीही सुरू होते पण या निमित्ताने जे बळी जातात त्यांचे काय, याचा विचार कधीही केला जात नाही. काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. कोणत्याही दुर्घटनेनंतर ज्या उपाययोजना केल्या जातात किंवा जे उपाय पूर्वीपासूनच अस्तित्वात होते पण त्याचे पालन न केल्यामुळे या दुर्घटना घडतात याचा विचार जेव्हा केला जातो तेव्हाच भविष्य काळातील दुर्घटना टाळता येऊ शकतात.
कोणत्याही एखाद्या उद्योगाला जेव्हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली जाते तेव्हा सर्व सेफ्टी मेजर्स लक्षात घेतले जातात आणि सर्व प्रकारचे परवाने घेऊनच या उद्योगांना उद्योग सुरू करायला परवानगी दिली जाते. अशा प्रकारच्या परवान्यांकडे आणि मार्गदर्शक तत्त्वाकडे दुर्लक्ष करण्याची सर्वसाधारण भूमिका घेतली जात असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना सातत्याने घडत असताना दिसतात. आगीच्या ज्या दुर्घटना सर्वसाधारणपणे घडतात त्याला आग लागण्याचे प्रमुख कारण शॉर्टसर्किट हेच असते. अनेक आस्थापनांमध्ये विद्युतीकरणाबाबत नेहमीच दुर्लक्षाची भूमिका असते हेच दुर्लक्ष प्राणघातक ठरू शकते.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये जलाशयांमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या ज्या घटना घडल्या त्यामध्येसुद्धा संबंधित ठिकाणी लागू असलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधितांना जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. आगामी कालावधीमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना टाळायच्या असतील तर नियमाप्रमाणे काम करून मानवी चुका न करण्याचा मंत्र जपावा लागणार.