सातारा -एखादयाला मिठी मारणे गैर नाही. कुणाला सॉरी म्हणणे किंवा कुणाला मोठया मनाने माफ करणे याकरीता निष्कपट मनाचा स्वभाव लागतो. मनात कपट ठेवून वागणाऱ्याला हे कधी समजणार नाही. आमची लोकप्रियता सतत खुपत असल्यानेच “मुहमे राम आणि बगलमे छुरी’ असा कपटी स्वभाव असणाऱ्यांनी आमचा भलताच धसका घेतला आहे, असा खासदार उदयनराजे भोसले यांनी कोमाचेही नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.
नगरपालिका सातारकर नागरिकांची आहे, सातारा विकास आघाडी नेहमीच विश्वस्ताच्या भूमिकेतुन वाटचाल करीत आली आहे. नगरपालिका म्हणजे सहकारी संस्था नाही. सभासदांच्या सहकारी संस्था म्हणजे स्वतःची मालकी समजणाऱ्यांनी, नगरपालिकेविषयी मालकीचे भाष्य करुन बाल्यावस्थेची कबुली दिली आहे, अशा शब्दांत त्यांनी फटकारले. याविषयी उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, सातत्याने सुमारे 40 वर्षे ज्यांच्या हातात निरंकुश सत्ता होती. त्यांना कधी हद्दवाढ करुन घेता आली नाही. त्रिशंकू शाहुपूरीतील मुलभूत गरजांची पूर्ती होण्यासाठी साधी ग्रामपंचायत स्थापन करता आली नाही. ते आता शाहुपूरीच्या विकासाच्या वल्गना करीत आहेत. आम्ही पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेचा ठराव करवून घेतला आणि शाहुपूरी ग्रामपंचायत अस्तित्वात आली. त्यामुळे शाहुपूरीकरांना काही प्रमाणात मुलभूत सुविधा मिळू लागल्या. त्यालाही यांचा त्यावेळी विरोध होता. शाहुपूरीचा दैनंदिन गोळा होणारा कचरा सोनगाव डेपोत टाकण्याला यांच्याच कुप्रवृत्तीने विरोध केला होता. शाहूपुरीचा कचरा सोनगाव डेपात टाकण्यास आम्ही होकार दिल्याने कचरा टाकण्याची समस्या मिटली. शाहूपुरीकरांसाठी नळ पाणीपुरवठा योजना यांच्या कुकर्तृत्वामुळेच रखडली. नाही तर मागेच शाहुपूरीसह सुमारे 16 गावे- वाडया- वस्त्यांना कण्हेर उद्भवामधून पाणी मिळाले असते. आता तोंड वर करुन शाहूपुरी नळपाणीपुरवठयाचे उदघाटन करणाऱ्यांना जनाची नाहीच आणि मनाचीसुध्दा काही उरली आहे असे वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.
“दृष्टी बदला… दृष्टिकोन बदलेल…’
आम्हास दादामहाराजांचा वारसा आहे. संपूर्ण सातारकर आम्ही आमचे कुटुंबातील सदस्य समजत आलो आहोत. त्यांच्या
सुखदुःखात समरस होत असतो. म्हणूनच कोणत्याही सातारकरास आलिंगन देताना किंवा मिठी मारताना आम्ही हातचे काही राखून ठेवत नाही. तुम्ही हातचा राखून ठेवणाऱ्यांपैकी आहात. म्हणूनच तुम्हाला आमच्या मिठी मारण्याच्या पध्दतीला स्वच्छ दृष्टीने पाहता येत नसल्यानेच तुम्ही अकारणच त्याचा धसका घेतला आहे. जरा दृष्टी बदला म्हणजे दृष्टिकोन बदलेल, असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
===================