अकोला – राज्यात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. विदर्भात तापमान चांगलेच वाढले आहे. असे असताना आजपासून पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे. यासंदर्भात हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील तापमान या चार दिवसांत 42 अंशाच्याही वर जाणार असल्याचे शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच पारा 40 अंशावर गेला. मार्च महिन्याच्या शेवटी तो वाढून 42 अंशावर पोहोचला आहे. एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे मुख्य दोन महिने आणखी बाकी आहेत. त्यामुळे विदर्भात आणखी तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव व उपायासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
उन्हाळा सुरु झाला तेव्हापासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता येत्या चार दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 4 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यानुसार, 29 मार्च 2022 रोजी बुलढाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे.