समाजवादी पक्षाचे नेते इम्रान मसूद यांनी फोडले ईव्हीएमवर खापर
लखनौ – अखिलेश यादव यांनी खुप मेहनत घेतली. त्यांना लोकांचा पाठिंबाही मिळाला, पण जिंकण्याच्या मार्गावर असलेले अनेक जण निवडणुकीत पराभूत झाले. बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्या पाहिजे. ईव्हीएममध्ये गडबड आहे. जोपर्यंत सध्याची व्यवस्था आहे, तोपर्यंत मोदी ज्यांना जिंकू पाहतात तेच लोक जिंकतील, असे वक्तव्य पश्चिम उत्तर प्रदेशातील मुस्लिम नेता इम्रान मसूद यांनी केले आहे.
मसूद म्हणाले की, निवडणुकीत बसपाची व्होट बॅंक यावेळी भाजपकडे वळली आहे. पण शेवटी ही मते सपाकडेच परत येणार आहेत, कारण लोकांना दुसरा पर्याय नाही. ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या कामगिरीने कोणालाही आश्चर्य वाटले नाही. पक्षात लढत नसल्याचे आधीच मानले जात होते. आम्ही प्रियांका गांधींना ग्राउंड रिऍलिटी सांगण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही. पहिल्या दिवसापासूनच लोकांना कॉंग्रेस लढताना दिसत नव्हती. पार्टी पूर्णपणे दृश्याबाहेर होती.
‘लडकी हूं लढ सकती हूं” या मोहिमेवर मसूद म्हणाले की, पोस्टरवर अनेक गोष्टी चांगल्या दिसतात पण प्रत्यक्षात त्यांचा काहीही परिणाम होत नाही. घोषणाही तशीच होती. प्रियंका गांधी यांच्या मेहनतीनंतरही कॉंग्रेसला यश मिळवता आले नाही.
मसूद म्हणाले, मी सपासोबतच राहणार आहे. पक्ष सांगेल ते काम करेल. मसूदच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आधीच ठरवले होते की, त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची नाही. कॉंग्रेस सोडून ते स्वत:च्या इच्छेनुसार सपामध्ये गेले आणि त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे, 2014 मध्ये, पंतप्रधान मोदींविरोधात तिखट वक्तव्य केल्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेले मसूद हे कॉंग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते. मात्र निवडणुकीपूर्वी त्यांनी सपामध्ये प्रवेश केला. भाजपचा पराभव करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.