पिंपरी -गेल्या चार पाच दिवसांपासून शहर परिसरात पारा चांगलाच तापला आहे. त्यामुळे उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भित्तीपत्रकाद्वारे केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण होत असल्याने घामाचा धारा लागत आहेत. दुपारी बाराच्या नंतर प्रचंड तापमान वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. दुपारी बारा ते तीन उन्हात फिरू नका, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका, चहा-कॉफी, मद्य सेवन, सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुले आणि पाळीव प्राण्यांना सोडू नका, तहान नसतानाही पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
उन्हात जाताना डोक्यावर छत्री, टोपी, गॉगल, चेहऱ्यासाठी ओला कपडा वापरा. सौम्य रंगाचे सैल, कॉटनचे कपडे वापरा. लिंबू पाणी, नारळ, पाणी, ताक, लस्सी घ्या. अशक्तपणा कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, सावलीचा सहारा उष्माघातापासून निवारा, असे या पत्रकात म्हटले आहे.