बीड – महाविकास आघाडीमध्ये एकही आमदार नाराज नाही. केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड हे उच्च शिक्षित आहेत. ते पुड्या सोडण्याचे काम करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे, अशी टीका राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. तसेच एमआयएमला सोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवारच घेतील. मात्र आमचे तीन चाके मजबूत आहेत. चौथ्या चाकाची आम्हाला गरज नाही. सध्या शिवसेनेला तरी एमआयएमची गरज नाही, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, शिवसेनेत जाता जाता मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेतला. मी भाजपमध्ये जाणार होतो, मात्र शिवसेनेत आलो. सत्तार नावातील र काढल्यास सत्ता होईल. कधी कधी राजकारणात मॅच फिक्सिंग करावी लागते, असे सत्तार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी खुली ऑफर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आघाडीतील आमदारांना दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर बीडमधील एका कार्यक्रमात सत्तार यांनी हे विधान केले आहे.
खासदार इम्तियाज जलील हे आमच्या जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. शिवसेना प्रमुख योग्य निर्णय घेतील. जलील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला ऑफर दिली आहे, सेनेकडे नाही. संजय राऊत हे आमचे नेते आहेत. ते जे बोलतात ते योग्य बोलतात. आमच्या तीन चाकांकडे 173 आमदार आहेत. सध्या आम्हाला चार चाकांची गरज नाही. जलील यांनी उद्धव ठाकरे साहेबांना भेटावे. यावर तेच निर्णय घेतील, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.