राजगुरूनगर – भामा आसखेड धरणाच्या जलसाठ्यात बुडून युवक युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी(दि.१८) रोजी घडली. रोहन संजय रोकडे ( वय.२४ वर्षे, सध्या रा.बिरदवडी,मूळ रा.जुन्नर) आणि प्राजक्ता देविदास पवार ( वय.२० वर्षे, रा. बिरदवडी) बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवक युवतीचे नाव आहे.
याबाबतची स्थानिकांनी दिलेली माहिती अशी की, बिरदवडी येथे राहणारे मयत रोहन रोकडे व प्राजक्ता पवार यांच्या कुटुंबातील ५ जण धुलीवंदनाच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी आज (दि.१८)भामा आसखेड धरणावरील शिवे गावानजीक फिरायला गेले होते. भामा आसखेड धरणातील जलाशयात दोन युवक व दोन युवती असे ४ जण पाण्यात उतरले होते. त्यातील एकाला पोहता येत होते. तिघांना पोहता येत नव्हते.
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने रोहन, प्राजक्ता आणि एक महिला असे तिघे जण खोल पाण्यात बुडू लागले, मात्र पाण्यात उतरलेल्या चौघांपैकी बारा तेरा वर्षाच्या मुलाला पोहता येत असल्याने त्याने महिलेला बाहेर काढले. मात्र रोहन आणि प्राजक्ता यांना पाण्याबाहेर काढणे शक्य झाले नाही.
यावेळी बाहेर असलेल्यांनी आरडाओरडा केला मात्र जवळपास कोणी नसल्याने वेळीच त्यांना बाहेर काढता आले नाही. काहीतरी घटना घडल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रोहन व प्राजक्ता खोल पाण्यात बुडाले होते. स्थानिक रहिवाशांनी पाण्यात उतरून रोहनला शोधून पाण्याबाहेर काढले. तर वन्यजीव रक्षक संस्था मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा येथील सदस्यांनी काही तासाच्या अथक परिश्रमानंतर धरणातून प्राजक्ताला शोधून पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले. भामा आसखेड धरणात बुडालेल्या युवक आणि युवतीच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.