इंफाळ – मणिपूरची सत्ता राखणाऱ्या भाजपने अद्याप मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केलेली नाही. ती घोषणा लांबल्याने मुख्यमंत्री तेच राहणार की बदलणार याविषयीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.
मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल आठवडाभरापूर्वी जाहीर झाला. त्या राज्यातील विधानसभेच्या एकूण 60 पैकी 32 जागा जिंकून भाजपने सत्ता राखली. मात्र, मुख्यमंत्रिपदी एन.बिरेन सिंह यांना कायम ठेवणार की दुसऱ्या नेत्याकडे नेतृत्व सोपवणार याविषयीचे पत्ते अजून भाजपने खोललेले नाहीत.
अशात मुख्यमंत्रिपदावरून मणिपूर भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. बिरेन सिंह आणि मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार बिस्वजीत सिंह दिल्लीवारी करून आल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्या दोघांनी केलेल्या वक्तव्यांनी मुख्यमंत्री कोण बनणार याविषयीची उत्सुकता आणखीच ताणली गेली आहे.
भाजपचे संसदीय मंडळ मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करेल. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ती घोषणा लांबली. बिरेन यांना पुन्हा संधी मिळेल असे वृत्त म्हणजे अंदाज आहे, असे बिस्वजीत यांनी म्हटले. तर, कोण मुख्यमंत्री बनणार याविषयीच्या निर्णयाची अद्याप मलाही माहिती नाही, असे बिरेन यांनी म्हटले.