लखनौ – नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, समाजवादी पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत मिळवण्यात अपयशी ठरला. परंतु यावेळी त्यांच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली आहे. पक्षाच्या मतांच्या या वाढीमागे स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह इतर अनेक नेत्यांचा हात असल्याचं ‘सपा’च्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने मौर्य यांना पूर्ण सन्मान देऊन विधानसभेत पाठवले पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव आजमगडची खासदारकी कायम ठेवत करहल विधानसभा मतदारसंघ सोडणार असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यांच्या राजीनाम्यानंतर करहल जागेवरील पोटनिवडणुकीत स्वामी प्रसाद मौर्य यांना पक्षाचा उमेदवार बनवण्याचाही पक्ष विचार करत आहे.
स्वामी प्रसाद यांनी रविवारी लखनऊमध्ये पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करहल येथील जागेसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
निवडणुकीपूर्वी भाजप सोडून सपामध्ये दाखल झालेले स्वामी प्रसाद मौर्य यांना पक्षाने कुशीनगरच्या फाजिलनगर जागेवरून उमेदवारी दिली होती, पण येथे त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे, अखिलेश यादव यांनी करहाल मतदार संघात 67 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य हे यूपीच्या राजकारणात यादवेतर इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) प्रमुख नेते मानले जातात. अशा परिस्थितीत सपाने त्यांना अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या करहलमधून पोटनिवडणुकीत उतरवल्यास त्यांचे विधानसभेत जाणे निश्चित होईल.