मुंबई – भारत आत्मनिर्भरतेसाठीच्या नव्या उभारीतून जात असून वस्त्रोद्योग क्षेत्रातले पुढचे युनिकॉर्न, आयसीटी म्हणजे रसायन तंत्रज्ञान संस्थेकडून यावे अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे. आत्मनिर्भरता पुनर्जागर या विषयावरच्या आयसीटी मुंबईच्या ई परिषद 2022 मध्ये ते बोलत होते. वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या उद्योजकतेसाठी आयसीटी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
देशात रसायन तंत्रज्ञान संस्थेकडे भारतातले उत्तम धागे आणि तंत्रज्ञान विभाग आहे. रिलायन्स उद्योगाचे मुकेश अंबानी, कॅडीला औषधनिर्मिती कंपनीचे इंद्रवदन मोदी, ल्युपिन लिमिटेडचे निलेश गुप्ता आणि एशियन पेंट्सचे अश्विन दाणी यासारखे नावाजलेले माजी विद्यार्थी असल्याचे गोयल म्हणाले.
भारताला आत्मनिर्भर विशेषतः रसायन आणि औषधनिर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी यांचे मोठे योगदान राहिल्याचे ते म्हणाले. एक संस्था संपूर्ण क्षेत्राला आकार देते हे अविश्वसनीय वाटावे असे आहे. तंत्रज्ञान जगतात किंवा व्यवस्थापन क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या आयव्ही लीग कॉलेजप्रमाणेच एका अर्थाने आयसीटी ही रसायन उद्योगासाठी आहे. हा वारसा पुढे जारी राखण्याची इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी असल्याचे गोयल यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे केलेल्या संबोधनात सांगितले.
वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने परिवर्तनकारक उपक्रम हाती घेतले असून सरकार प्रवर्तक म्हणून काम करत आहे. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना, 7 मेगा वस्त्रोद्योग पार्क्सची स्थापना, राष्ट्रीय तंत्र वस्त्रोद्योग मिशनची सुरवात यासारख्या उपक्रमाद्वारे तंत्र वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताला जगात आघाडीचा देश बनवण्यासाठी सरकार काम करत असून 31 प्रकल्पांना याआधीच मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत आत्मनिर्भर पुनर्जागरातून जात आहे. नव युगात देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी अतिशय महत्वाचा घटक मानला जाणाऱ्या नवोन्मेश, संशोधन आणि विकासात भारताने मोठी झेप घेतली आहे. टप्याटप्याने बदल किंवा सुधारणेवर कोणी संतुष्ट नाही तर ज्या जगात आपण राहतो त्या जगात लोकांची मोठ्या परिवर्तनाची अपेक्षा असल्याचे गोयल यांनी सांगितले.
युपीआय चा प्रारंभ केल्यापासून पाच वर्षात भारत डिजिटल व्यवहारात जागतिक स्तरावरचा आघाडीचा देश ठरला आहे. आज आपल्याकडे जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप्स परिसंस्था असून पाच वर्षात 65,000 पेक्षा जास्त स्टार्ट अप्सची नोंदणी झाली, या स्टार्टअप्सनी लाखो रोजगाराची निर्मिती केली असून यातले 90 पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत.
भारताचे सध्याचे दशक हे तंत्रज्ञान-आधारीत दशक आहे, जिथे भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा मुख्य घटक म्हणून तंत्रज्ञान आणि नवोन्मेष राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचे गोयल म्हणाले.