किव्ह, (युक्रेन) – रशियाच्या फौजांनी आज युक्रेनच्या महत्वाच्या बंदराचा ताबा घेतला आणि एका अन्य बंदराला वेढा घातला. यामुळे युक्रेनचा सागरी जलमार्गांशी असलेला संपर्क तोडून टाकण्यात आला आहे. एकीकडे लष्करी कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे रशियाने युक्रेनबरोबर चर्चेची तयारीही दर्शवली आहे. सध्या सुरू असलेली लष्करी कारवाई संपवण्यासाठी ही चर्चा करायला आपण तयार असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधून आतापर्यंत तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी सीमा ओलांडून शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.
खेरोसान या बंदराचा ताबा रशियाच्या सैन्याने घेतला असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. खेरोसान या काळ्या समुद्रातील बंदराच्या शहराच्या स्थानिक सरकारी मुख्यालयाचा ताबा रशियाच्या फौजांनी घेतला असल्याच्या वृत्ताला युक्रेनच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. खेरोसान बंदरातील लोकसंख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे. हे बंदर रशियाच्या फौजांनी ताब्यात घेतल्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्वाचे शहर ताब्यात आले आहे. रशियाने आठवड्याभरापूर्वी आक्रमणाला सुरुवात केल्यापासून रशियाच्या ताब्यात प्रथमच युक्रेनचे मोठे शहर पडले आहे.
दुसरीकडे रशियाने अनेक आघाड्यांवरून युक्रेनवर हल्ल्यांना सुरुवात केली आहे. राजधानी किव्हच्या बाहेर गेल्या अनेक दिवसांपासून रणगाडे आणि चिलखती वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर अझोव समुद्रातील मारिओपूल या आणखीन एक बंदरालाही रशियाच्या सैन्याने वेढा घातला आहे. आता या बंदरातील वीज आणि दूरध्वनी संपर्क यंत्रणा बंद पडली आहे. दुकानांमध्ये आणि नागरिकांच्या घरांमधील अन्नधान्याचा साठाही संपत आला आहे. संपर्क यंत्रणा बंद असल्यामुळे वैद्यकीय सुविधा कोठे मिळू शकतील हे देखील जाणून घेता येऊ शकत नाही आहे.
युक्रेनच्या 2 टक्के जनतेचे पलायन
गेले 7 दिवस सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनच्या 2 टक्के जनतेने पलायन केले आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी मदत एजन्सीने म्हटले आहे. यामध्ये युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकिव्ह शहरातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. रेल्वे स्थानकांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र त्यांचा प्रवास कोठपर्यंत होईल याची त्यांनाही कोणतीही शाश्वती नाही आहे. खारकिव्हमध्ये झालेल्या बॉम्बवर्षावामुळे किमान 227 जणांचा मृत्यू झाला आणि 525 जण जखमी झाले असल्याचे मानवी हक्कांसाठीच्या संयुक्त राष्ट्राच्या उच्चायुक्तालयाने म्हटले आहे.