पुणे – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.च्या वाघोली येथून पंचशील टॉवर वरून गेलेल्या अति उच्च दाब वीजवाहिनीचा धोका आहे. नागरीवस्ती असल्याने दुर्घटनाघडून जीवतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातून जाणारी अति उच्चदाब वीजवाहिनी भूमिगत न्यावी अथवा स्थलांतरीत करावी, यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करू, परंतु, हे काम गांभीर्यपूर्वक तातडीने करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोलीसह पंचशील टॉवर परिसरातील नागरिकांनी सदर प्रश्न ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे मांडला होता. त्यानुसार कटके यांनी आज महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.चे अधिकारी, अभियंत्यांशी तातडीचे बैठक घेत या समस्येबाबत चर्चा करीत निवेदन दिले. तर, नागरिकांकडून ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यास सदर काम वेगाने केले जाईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कटके यांना दिले आहे.
वाघोली येथे ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे-नगर महामार्गाकडे जाणाऱ्या ढोले पाटील रस्त्यालगत रहिवासी इमारती, शाळा, महाविद्यालये आहेत. याच ठिकाणीा रस्त्याच्या मध्यभागी अति उच्च दाबाची वीजवाहिनी गेली आहे. नागरीवस्ती पाहता येथे अपघाताचा धोका असून यातून मोठी जीवीतहानी होऊ शकते.
येथे असलेल्या पंचशील टॉवरमध्ये सुमारे 1040 सदनिकाधारक राहतात. यासह याच रस्त्यालगत मार्व्हल झायफर, गेरा प्लॅनेट ऑफ जॉय, मॅजेस्टिक टॉवर्स या निवासी सोसायट्या, शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, पोदार इंटरनॅशनल स्कूल, फिनिक्स स्कूल, फिजिओथेरपी महाविद्यालय आहे. त्यामुळे याठिकाणी शिकणारे विद्यार्थी, पालक व वाहनचालक अशी वर्दळ असते त्यामुळे अति उच्च दाब वीजवाहिनीचा मोठा धोका लक्षात घेता ती भूमिगत करणे अथवा स्थलांतरीत करणे गरजेचे आहे.
वाघोलीची स्मार्ट शहराकड वाटचाल असताना अशा प्रकारे उघड्यावरील वाहिन्या अप्रगतीची लक्षणे आहे तरी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.च्या अधिकाऱ्यांनी सदर समस्या तातडीने साडवावी, अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आल्याचे ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.