जांबूत – शिरूर तालुक्याची पश्चिम बेट भागातील पिंपरखेड, जांबूत, चांडोह आदी भागात बिबट्यांची वाढती संख्या पाहता वनविभागाने त्वरित पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्यांची संख्या वाढत असल्याने चार- पाच च्या संख्येने मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मुक्तसंचार वाढला असून दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांची संख्या मोठी असून सध्या या भागात सुरू असलेली ऊसतोड आणि उन्हाची तीव्रता यामुळे अन्न व पाण्याच्या शोधात बिबटे दिवसाढवळ्या बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी (दि. 1) पिंपरखेड (ता. शिरूर) येथील शेतकरी सोपान ढोमे यांच्या गोठ्यात रात्रीच्या सुमारास अंदाजे सात ते आठ फुटाच्या जाळीवरून बिबट्याने उडी मारून शेळीला जखमी केले. काही वेळाने ढोमे कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी गोठ्यात येऊन पहिले असता त्यांना गोठ्यात बिबट्या आढळून आला. यावेळी माजी उपसरपंच नरेश ढोमे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला परंतु काही वेळानंतर पुन्हा उंच जळीवरून उडी मारून बिबट्याने धूम ठोकली.
यामुळे लहान बालके, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांच्या जीवाला धोका होऊन आम्हाला घराबाहेर पडणे भीतीदायक होऊ शकते या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून तात्काळ पिंजरे लावावेत व बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी माजी उपसरपंच नरेश ढोमे यांनी केली आहे.
बिबट्या पाठोपाठ या परिसरात तरसांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. तरस आणि बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असल्याने इतर छोट्या छोट्या जंगली प्राण्यांची संख्या घटत चालली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकदा तरस आणि बिबटे वाहनांना आडवे येत आहेत. तरी वनविभागाने पिंजरा लावून हल्ले टाळण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बोंबे यांनी केली.