मुंबई – भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना आमने-समाने आले आहेत. भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्या तर शिवसेनेकडून संजय राऊत आघाडीवर आहेत. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर कडाडून टीका केली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
पत्रकरांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले,’महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर असून हे आरोप-प्रत्यारोप फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप प्रत्यारोप राहिले नसून आता अनेक हत्यांचे आरोप होत आहेत. हत्यांच्या आरोपांबाबत एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. या प्रकरणावर आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे. ते पुढे म्हणाले, आता तरी सत्य परिस्थिती समोर आणावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.