प्रसाद पाटील
वास्तुकला, शिल्पकला, मूर्तिकला यामध्ये चीन नेहमीच आघाडीवर राहिला आहे. चीनने या कलेचा व्यापारीदृष्ट्याही अत्यंत खुबीने वापर करून घेतला आहे. सध्या जगभरात भव्यदिव्य पुतळे निर्यात करण्याचे काम चीनकडून केले जात आहे. विशेष म्हणजे भारतातील संत रामानुजाचार्य यांचा पुतळा असो किंवा गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असो, त्यांची निर्मिती आणि बांधणी चीनमध्येच झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच तेलंगणची राजधानी हैदराबाद येथे “स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे अनावरण केले. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा अकराव्या आणि बाराव्या शतकातील महान हिंदू संत रामानुजाचार्य यांची भव्यदिव्य मूर्ती आहे. 216 फूट उंचीची प्रतिमा ही चीनहून तयार करून आणली. चीनची कंपनी एरोसन कॉर्पोरेशनने सात हजार टनांच्या पंचधातूपासून (कॉपर, सिल्व्हर, गोल्ड, झिंक आणि टायटेनियमचे मिश्रण) या पुतळ्याची निर्मिती केली. यासाठी सुमारे 135 कोटी रुपयांचा खर्च आला. हा पुतळा तब्बल 1600 भागांतून भारतात आणण्यात आला. त्याची आखणी भारतातच झाली होती आणि त्याची जुळणीदेखील भारतातच झाली. पण पुतळ्याची निर्मिती आणि बांधणी चीनमध्ये झाल्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरले आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील पुतळे चीनमध्येच तयार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत’बाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांची टीका निरर्थक म्हणता येणार नाही. कारण मागील काळात देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातच्या केवडिया येथे उभारलेला “स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा पुतळादेखील चीनमध्येच तयार केला आहे. त्याची उंची 597 फूट आहे आणि त्याची रचना प्रसिद्ध मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी केली आहे. या पुतळ्याचे प्रमुख कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले होते आणि त्यांनी चीनच्या कंपनीला मूर्ती तयार करण्याचे काम सोपवले. आंध्र प्रदेशचे सरकारदेखील विजयवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभा करण्याचा विचार करत असून यासाठी राज्य सरकारने चीनच्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे.
भव्य पुतळ्यांची निर्मितीचे गुपित
चीनने स्थापत्यकलेमध्ये प्रचंड प्रगती केली आहे. तेथे मोठ्या इमारती आणि भव्यदिव्य पुतळे उभारणीकडे कल वाढला आहे. काळानुसार चीनने गगनचुंबी इमारती आणि विशाल मूर्ती तयार करण्याचे कौशल्य प्राप्त केले आहे. 2016 मध्ये चीनने 80 गगनचुंबी इमारती तयार करून विक्रम नोंदवला. सर्व इमारती 650 फूटांपेक्षा अधिक उंच आहेत. गेल्या दशकभरात चीनमधील कंपन्यांनी कांस्य धातूपासून हजारो भव्यदिव्य पुतळे उभारले आहेत. यापैकी “स्प्रिंग टेंपल बुद्धा’ यासारखा भव्य पुतळा देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतो. एका अंदाजानुसार चीनमध्ये भगवान बुद्धांच्या एक हजारापेक्षा अधिक भव्य मूर्ती असून त्यांची सरासरी उंची 500 फुटांपेक्षा अधिक आहे.
हे पुतळे चीनमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 2016 मध्ये एका चिनी कंपनीने 58 मीटर उंचीची प्रतिमा उभारली होती. गेल्या एक दीड दशकांपासून भव्य पुतळे तयार करण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष चीनकडे लागले आहे.
चीनमध्ये मूर्तिकलेची मोठी परंपरा आहे. तेथे अनेक वर्षांपासून कांस्य धातूपासून पुतळे तयार केले जात आहेत. चिनी कंपन्या त्यांचे मार्केटिंग योग्य प्रकारे करून जगात प्रसिद्धी मिळवत आहेत. या कंपन्या भव्य पुतळ्याची उभारणी करताना पारंपरिक, आधुनिक तसेच तंत्रज्ञान यांमध्ये समन्वय साधत आहेत.
चीनमध्ये भव्य पुतळे हे वेगवेगळ्या भागांतून तयार केले जातात. यासाठी मोठे कारखाने उभारण्यात आले असून तेथे हजारो कामगार काम करतात. वेगवेगळ्या भागांत पुतळ्याची निर्मिती होत असल्याने त्याच्या बांधणीसाठी कमी वेळ लागतो. या कंपन्यांकडे तंत्रकुशल कारागिरांची टीम असते. थ्रीडी आधुनिक सारख्या तंत्राचा आधार घेत एकाहून एक सरस मूर्ती चीनमध्ये तयार केल्या जात आहेत. चीनमध्ये विविध भागांत तयार केलेले पुतळे हा कालांतराने टप्प्याटप्प्यात विविध ठिकाणी पाठवण्यात येतो. त्यानंतर तेथे त्यांची जोडणी केली जाते आणि नंतर पॉलिश केले जाते.
चीनमधील सीनो मूर्तिकला समूह लिमिटेडसारख्या कंपन्या कांस्य, तांबे, स्टेनलेस स्टील, ऍल्युमिनियम, कॉर्टन स्टील, कार्बन स्टील आणि अन्य स्टीलच्या डिझाइन आणि उत्पादनासाठी आघाडीच्या कंपन्या मानल्या जातात. गेल्या दोन दशकांत या कंपन्यांनी एकाहून एक सरस आणि दर्जेदार पुतळ्यांची निर्मिती केली आहे. या कंपन्यांना जगभरातील कलाकार, मूर्तिकार, वास्तुकार आणि रचनाकारांची मान्यता असल्याचा दावा केला जात आहे.
भारताच्या बाबतीत विचार केल्यास विविध धातूंपासून मूर्ती, पुतळे तयार करण्याची कला प्राचीन आहे. धातूंपासून देवी-देवतांच्या मूर्ती आणि सजावट तयार केली जाते. पण शेकडो फूट उंचीचे भव्य पुतळे तयार करण्यासाठी आवश्यक असणारे विशेष कौशल्य आणि तंत्रज्ञान तसेच यासाठीच्या पायाभूत सुविधांचा भारतात अभाव आहे. सबब, चीनमधून पुतळे आयात करण्यावर आक्षेप जरी योग्य असला तरी हा मुद्दा राजकारण किंवा वाद-प्रतिवादापुरता मर्यादित राहता कामा नये. राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवरच्या मूर्तिकारांना पायाभूत सुविधा, नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालण्यासाठीचे कौशल्य यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढाकार घ्यायला हवा.