महापालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, पत्राशेड यावर कारवाई करण्यात येत आहे. या वर्षामध्ये ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील पदपथ मोकळे व्हावेत तसेच अनधिकृत बांधकामांना लगाम बसावा, यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये साडेचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
2020-21 च्या अंदाजपत्रकामध्ये अतिक्रमण निर्मुलनासाठी फक्त अडीच कोटींची तरतूद करण्यात आली होती. तर गतवर्षी त्यामध्ये वाढ करत चार कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावर्षी त्यामध्ये आणखी वाढ करत अतिक्रमण कारवाईसाठी साडेचार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. अनधिकृत टपरी व पथारीवाल्यांवर महापालिकेच्या अनधिकृत निर्मूलन पथकाच्यावतीने कारवाई करण्यात येते.
मात्र काही दिवसांमध्येच पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. सन 2022-23 या वर्षामध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत व्यावसायिकांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. कारवाई करण्यासाठी पथक तैनात करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.