अलिगड – भारतीय जनता पक्ष उत्तरप्रदेशातील समाजाला धर्मात विभाजित करून पुन्हा आपला राजकीय डाव साधण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यांना पुन्हा या राज्यात हिंदु-मुस्लिम असा झगडा लावायचा आहे. त्यामुळे येत्या 10 मार्च पर्यंत उत्तरप्रदेशात आता हिंदु-मुस्लिम आणि बॅरिस्टर जिना हे आपले पाहुणे असणार आहेत असा उपरोधिक टोमणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजपला मारला आहे.
काल रात्री येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की उत्तरप्रदेशातील शेतकरी भाजपचा हा डाव ओळखून आहेत. ते हिंदु-मुस्लिम वादात भरडले जाणार नाहीत आपल्याला कोणाची निवड करायची आहे हे त्यांना चांगले महिती आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे पुढील काही दिवस हिंदु-मुस्लिम आणि बॅरिस्टर जिना हेच विषय चघळले जातील. येथील लोकांची माथी पुन्हा भडकवण्याचे प्रयत्न होतील पण आता त्यामुळे कोणीही विचलीत होणार नाही असे त्यांनी नमूद केले. ज्यांनी शेतकऱ्यांना आपली उत्त्पादने निम्म्यापेक्षाही कमी किंमतीत विकणे भाग पाडले त्यांच्या विषयी आता मतदानात काय भूमिका घ्यायची हे येथील शेतकऱ्यांना शिकवण्याची गरज नाही. शेतकरी या निवडणुकीचे महत्व पूर्ण जाणून आहेत, आणि ते यावेळी अधिक सजग आहेत असेही टिकैत यांनी नमूद केले.