जालना – स्थानिक प्रशासनाने मान्यता दिलेल्या ठिकाणी उद्यापासून (सोमवार) शाळा सुरू होणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
लोकल सर्कल कम्युनिटी प्लॅंटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणात 62 टक्के पालकांची मानसिकता मुलांना शाळेत पाठवण्याची नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना टोपे म्हणाले, पालकांनी काळजी करण्याचे कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू आहे. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे.
शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत.लोकांनी नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.