पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध करून देण्याबाबत सत्ताधारी भाजपने सातत्याने चमकोगिरी केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी केलेला डिसेंबर 2021 अखेरपर्यंत अतिरिक्त पाणीसाठा आणण्याचा दावा फोल ठरला आहे. महापालिकेतील या सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून सोसायट्यांना विहिरीतील पाणी पुरविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शनिवारी (दि. 22) केला आहे.
याबाबत संजोग वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, पिंपरी चिंचवडचे वाढते नागरिकरण आणि लोकसंख्या विचारात घेऊन शहराला अतिरिक्त पाणीसाठा गरजेचा आहे. ही बाब विचारात घेऊन शहरासाठी आंद्रा, भामा आसखेड धरणात पाणी कोटा आरक्षित केला. ते पाणी शहरासाठी आणण्याचे नियोजन सुरू करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात शहरात दिवसातून दोन वेळा आणि किमान दररोज पाणीपुरवठा केला जात होता.
24 तास पाणी देण्याचे नियोजन त्यावेळी सुरू केले गेले. परंतु भाजपच्या हाती सत्ता गेल्यापासून शहरातील पाणीप्रश्न बिकट बनलेला आहे. शहरातील नागरिकांना दररोज एकवेळ देखील पाणीपुरवठा महापालिकेच्या माध्यमातून होत नाही. भाजपला सत्ता मिळाल्यानंतर दिवसाआड शहराला पाणी पुरविले जात आहे. केवळ कोट्यवधींचा खर्च करून भाजपने शहराची फसवणूक आणि नागरिकांचा विश्वासघात केला आहे.
चिखली भागात सोसायटीतील रहिवाशांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी चक्क भाजप नगरसेवकाने विहीर बांधली. त्या विहिरीचे उद्घाटन सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी केल्याचे समजले. ज्या शहराला आणि तेथील नागरिकांना महापालिका यंत्रणेच्या माध्यमातून सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहेत. ते सत्ताधारी नागरिकांना विहीरीचे पाणी वापरण्यास भाग पाडत आहेत. या पेक्षा शहरासाठी दुर्दैवी बाब कोणती? हे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पाच वर्षातील सर्वात मोठे अपयश आहे, अशी टीका वाघेरे यांनी केली.