पाटणा – बिहारमधील सत्तारूढ आघाडीत (एनडीए) गोंधळाची स्थिती आहे. सत्तेवर असणाऱ्या मित्रपक्षांमधील मनभेद वाढले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता आहे, असा दावा लोजपचे नेते आणि खासदार चिराग पासवान यांनी केला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजप या सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरून सातत्याने धुसफूस होताना दिसते. त्याचा संदर्भ घेऊन चिराग यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मुदतपूर्व निवडणुकीचे भाकित केले.
बिहारमधील आताचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे मी सुरूवातीपासूनच म्हणत आहे. आता त्याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. नितीश फारसे घराबाहेर पडत नाहीत. मात्र, राज्यव्यापी दौरा करण्याचा मानस त्यांनी नुकताच बोलून दाखवला आहे. त्यातून बिहारची वाटचाल मुदतपूर्व निवडणुकीच्या दिशेने सुरू झाल्याचे वाटते, असे ते म्हणाले.