शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील एका विधवा महिलेवर आठ नराधमांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. सदर गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून यातील आरोपींना एक महिन्यात फासावर लटकवावे, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील शिरूर पोलीस स्टेशनमध्ये एका विधवा महिलेवर महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन गावातील आठ नराधमांनी वेळोवेळी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आठ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गावातील ग्रामस्थांशी संपर्क साधला असताना सदर महिला गर्भवती असल्याचे समोर आले आहे, तर महाराष्ट्रात नेमके चाललंय तरी काय असा सवाल तृप्ती देसाई यांनी करीत नुकतेच गृहराज्यमंत्री यांच्या सातारा जिल्ह्यात गर्भवती महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण होते.
पुणे सारख्या जिल्ह्यात विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केला जात असल्याची बाब निंदनीय असल्याचे म्हटले आहे. तर, शिरूर तालुक्यातील बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून या महिलेला न्याय मिळावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.