मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर राज्यात जे राजकीय युद्ध निर्माण झाले होते. त्याला कथित ‘गावगुंड’ मोदी याने माध्यमांसमोर येत पूर्णविराम लगावला आहे. पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले होते तो आपणच असून आपलेच टोपण नाव मोदी असल्याचा दावा उमेश प्रेमदास घरडे याने पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, त्यांनी आता आणखी एक दावा केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी हे नाव उच्चारून केलेल्या वक्तव्यावरून राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र हे वक्तव्य पंतप्रधान मोदींबाबत नसून मोदी हे टोपण नाव असलेल्या गावगुंडाबद्दल होते, असा दावा पटोले यांनी केला होता. त्यानंतर वकील सतीश उके या गावगुंड मोदी म्हणजेच उमेश घरडेसोबत आले होते.
यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उमेश घरडे याने, “दारूच्या नशेत मी कोणाला काहीही बोलून देतो, दारू प्यायल्यानंतर नाना पटोले यांच्यासह आणखी एकाला मी शिवीगाळ केली होती. मला नाना पटोले यांची माफी मागायला जाणार होतो, परंतु मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, पोलीस स्टेशनला तक्रार दिली मग गावी गेलो, लोक तिथे धमकी द्यायचे, त्यानंतर मी परत नागपूरला आलो. त्यानंतर वकील सतीश उके यांना भेटलो,” असे त्यांनी सांगितले.
“बायको सोडून गेल्यामुळे त्याला मोदी म्हणतात. गेल्या ४ वर्षांपासून त्याला लोक मोदी म्हणतात. गावातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्याला मोदी नावानेच हाक मारतात. त्याला त्याच्या नावाने कोणीच हाक मारत नाही,” असे वकील सतीश उके म्हणाले. तर, “मी दारूचा व्यवसाय करतो, नाना पटोले मला बोलत असतील, तर मी त्यांना देखील बोलू शकतो, माझी बायको सोडून गेल्यानंतर मला सगळे मोदी बोलू लागले. मी गावात भांडणं, हाणामारी करत असतो, त्यामुळे लोक मला घाबरतात,” असे उमेश घरडे म्हणाला.